पूरपरिस्थितीमुळे शहरात दोन ठिकाणी केली निवारा केंद्रांची स्थापना : नागरिकांच्या मदतीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील नालाकाठावरील आणि सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या परिसरातील रहिवाशांसाठी महापालिकेने शुक्रवारी सकाळी तातडीने निवारा केंद्रांची स्थापना केली. तसेच चौगुलेवाडीतील 65 नागरिकांचे स्थलांतर निवारा केंद्रात केले.
गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाणीच पाणी झाले असून सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर वाढला की नालाकाठावरील वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरते. दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे चौगुलेवाडी, गजानन महाराजनगर, कावेरीनगर, बाळकृष्णनगर, अन्नपुर्णेश्वरीनगर, केशवनगर आणि साईनगर अशा विविध भागात पाणी वाढले असून घरांमध्ये शिरत आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने नाल्याच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली येत नसल्याने नालाकाठावरील वसाहतींमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात दोन ठिकाणी निवारा केंद्रांची स्थापना शुक्रवारी सकाळी तातडीने केली.
कैवल्य योग मंदिर येथे स्थलांतर
धारवाड रोड येथील साई भवन आणि टिळकवाडी येथील कैवल्य योग मंदिर येथे नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या वसाहतीमधील रहिवाशांना स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने सध्या दोन ठिकाणी मदत केंदे सुरू केली आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी काही ठिकाणी केंदे सुरू करून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. चौगुलेवाडी, नानावाडी तसेच गजानन महाराजनगर अशा विविध भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शुक्रवारी सकाळी 65 नागरिकांना सुरक्षितरित्या कैवल्य योग मंदिर येथे स्थलांतर करण्यात आले. दोन ठिकाणी निवारा केंदे स्थापन करून नागरिकांच्या मदतीसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे.