ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगाला दिशा देण्यासाठी भारताला सशक्त आणि आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील कौशल्य शक्तीला विकसित करावे लागेल. कोरोनासारख्या संकटात ‘आत्मनिर्भर भारत’ हाच देशासाठी मंत्र आहे. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
आज देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केले.
मोदी म्हणाले, आज देशापुढे कोरोनाचे मोठे संकट आहे. कोरोना मृतांबाबत दुःख आहेच. या संकटाला तोंड देण्यास देश सज्ज आहे. प्रत्येक स्वातंत्र्य दिन नवी प्रेरणा घेऊन येतो. यावर्षी नव्या संकल्पाची देशाला संधी आहे. कोरोना संकटात ‘आत्मनिर्भर भारत’ हा देशासाठी सध्याचा मंत्र आहे. देशातील तरुण, महिला शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. कोरोना संकटात कोट्यवधी देशवासीयांचा आत्मनिर्भर होण्याचा संकल्प आहे. देशातील जनता जो संकल्प करते तो जिद्दीने पूर्ण करते. त्यामुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.
जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने मोठे योगदान दिले पाहिजे. त्यासाठी भारताला सशक्त आणि आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. देशवासियांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांच्यामधील कौशल्य शक्तीला विकसित करावे लागेल. आपण किती दिवस कच्चा माल निर्यात करून पक्का माल आयात करणार, पक्का माल देशातच तयार व्हायला हवा, यासाठी संकल्प करू.
कृषी क्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे. मात्र, या क्षेत्रातही आधुनिकता आणण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकरी कोणत्याही देशात आपले उत्पादन विकू शकतील. वोकल फॉर लोकल भारतीयांच्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. मेक इन इंडिया प्रमाणे आता मेक फॉर वर्ल्डसाठी उत्पादने तयार करायची आहेत.