मनीषा पंचकममध्ये शंकराचार्यांचे विचार : स्वामी चित्प्रकाशानंद सरस्वती यांचे वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
आत्मतत्त्वाचा कोणी नाश करू शकत नाही. हे जग ज्यापासून उत्पन्न झाले आहे, जो जगाला व्यापून आहे तो ‘बह्म’ आहे. तो चांडाल किंवा द्वीज रुपात असला तरी माझ्यासाठी गुरुस्थानी आहे. हा विचार शंकराचार्य मांडतात. सर्वांना त्याचे सहज आकलन व्हावे यासाठी त्यांनी मनीषा पंचकम या लघुग्रंथाची निर्मिती केली, असे स्वामी चित्प्रकाशानंद यांनी सांगितले. वसंत व्याख्यानमालेत ‘मनीषा पंचकम’ या विषयावर ते बोलत होते. हेरवाडकर शाळेत हे व्याख्यान झाले. व्यासपीठावर शिल्पा लांडगे, सुमन रानडे, धनश्री नाईक, विजया पुजारी, अध्यक्षा मीना खानोलकर, उपाध्यक्षा स्वरुपा इनामदार, दीपा देशपांडे उपस्थित होत्या.
स्वामी म्हणाले, भारतात सहा आस्तिक, सहा नास्तिक दर्शनाचा उगम झाला आहे. आज जगन्मान्य सिद्धांत आहे तो अद्वैत सिद्धांत. परमात्मा हे सत्य आहे, जे चिरंतन आहे. मात्र सत्य असल्याशिवाय मिथ्या असणार नाही हे शंकराचार्यांनी शांकत्भाष्याद्वारे स्पष्ट केले आहे.
शंकराचार्यांनी दशोपनिषद, ब्रह्मसूत्र व भगद्गीतेवर आधारित हे भाष्य केले आहे. या तीन ग्रंथांना प्रस्तानत्रयी म्हटले आहे. हे भाष्य सिद्धांत प्रतिपादक आहे. परंतु आभ्यासाविना अद्वैत सिद्धांत समजणार नाही म्हणून त्याचा मूळगाभा समजण्यासाठी शंकराचार्यांनी अनेक प्रकरणे लिहिली. त्यातील एक आहे विवेक चुडामणी व दुसरे आहे ‘मनीषा पंचकम’.
मनीषा पंचकम हा सहा श्लोकांचा ग्रंथ आहे. ‘मनीषा’ म्हणजे बुद्धी, ज्ञान, मन. बुद्धी हा अंतःकरणाचा एक भाग. तो मनातील संकल्प-विकल्पावर नियंत्रण करणे होय.
भारतभ्रमण करताना शंकराचार्य काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जाताना एक व्यक्ती त्यांना स्पर्श करते, तेव्हा ते दूर हो असे सांगतात. तेव्हा मनुष्य आवतार धारण केलेले परमेश्वर विचारतात ‘तू देहाला देहापासून का आत्म्याला आत्म्यापासून दूर करतो आहेस? कारण जो बदलत नाही, तो आत्मा आहे. आपला देह हा घट आहे, मग त्यामध्ये असणारे चैतन्यतत्त्व एक आहे का, असा प्रश्न चांडाल करतात.
यावर शंकराचार्य स्पष्ट करतात की, आपल्या प्रत्येकाचे स्वरुप आनंदाचे आहे. शरीरात भेद असले तरी त्यातील तत्त्व वेगळे हे सिद्ध करात येत नाही. प्रत्येक देशातील आत्मतत्त्व एकच त्यामुळे देहापासून देहाला, आत्म्यापासून आत्म्याला वेगळे करू इच्छीत नाही हाच अद्वैत सिद्धांत होय, असे स्वामींनी सांगितले.
जन्मतः प्रत्येकजण क्षूद्र असतो. संस्काराने तो द्विज (द्वितीय जन्म) होतो व इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य वेगळा ठरतो. ‘वेद’ अध्ययनानंतर ब्रम्हसत्य, जगन्मिथ्या हे तत्त्व जो जाणतो तो ब्राह्मण होय, असे सांगून स्वामी म्हणाले, विवेक जागृत असेल तर सत्याचाच स्वीकार केला जातो व मिथ्याचा त्याग केला जातो, अशी व्यक्ती माझ्यासाठी गुरुस्थानी आहे. देहाने कोणी श्रेष्ठ-कनिष्ठ नाही. तसेच आत्माही एकच आहे, हे स्पष्ट करण्यासाठीच चांडालरुपी परमेश्वर शंकराचार्यांना प्रश्न करतात, असे स्वामींनी नमूद केले.
प्रारंभी संपदा जोशी, आशा मनोहर, नलुताई साठे, उषा बुद्धीहाळकर, अशोक याळगी, या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. नुपूर रानडे हिने ईशस्तवन म्हटले.
केतन किरण इनामदार, अनय श्रीकुमार मोदाणी या छोटय़ांनी गीतेचा बारावा अध्याय सादर केला. स्वामींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. मीना खानोलकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष स्वरुपा इनामदार यांनी देणगीदार तसेच व्याख्यानमालेला सहकार्य करणाऱयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. व वक्त्यांच्या हस्ते सत्कार झाला. सूत्रसंचालन करून प्रियांका केळकर यांनी आभार मानले.
सदर व्याख्यानमालेला राज्य मराठी विकास संस्थेतर्फे बृहन्महाराष्ट्र मंडळ अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत अनुदान लाभले असून त्यासाठी प्रा. स्वरुपा इनामदार यांनी सहकार्य केल्याचे प्रा. मीना खानोलकर यांनी सांगितले. दरम्यान, सभागृह सॅनिटायझर करून, मास्क आणि सामाजिक आंतराचा नियम पाळून ही व्याख्यानमाला सुरू झाली.
जागृत, सुप्त, सुषुप्ती या तीन अवस्था
जागृत, सुप्त, सुषुप्ती या तीन अवस्था आहेत. हे विश्व शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध यांनी युक्त आहे. याची अनुभूती होते ती जागृतावस्था आहे. व निद्रेच्या अधीन होऊन स्वप्न पडते ती स्वप्नावस्था, परंतु सुषुप्ती अवस्थेत कसलाही विचार, त्रास नसतो, तीन अवस्था पूर्णतः भिन्न आहेत. मात्र या तीन अवस्थांना जाणणारे तत्त्व किंवा जो कोणी आहे तो ‘मी’ आहे. मात्र तो ‘मी’ देहासहीत मी नाही. तीन अवस्था मी एकचवेळी अनुभवू शकत नाही. परंतु मी त्याचा साक्षीदार असू शकतो, असेही स्वामींनी नमूद केले.