प्रतिनिधी / जत
जत तालुक्यातील वंचित गावासाठी तत्वतः मान्यता असलेली विस्तारीत म्हैसाळ योजना जत भाग योजनेस मंजूरी देऊन त्वरीत सुरू करण्यात यावी अशी मागणी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंतरावजी पाटील यांच्याकडे केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य प्रकाश जमदाडे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, जत तालुका सांगली जिल्हयात सर्वात मोठा तालुका असून एकही बारमाही नदी नसलेने कायम दुष्काळी तालुका आहे. तालुक्यात मोठया प्रमाणात साठवण तलाव, पाझर तलाव व सिमेंट बंधारे झाले आहेत. परंतू पावसाचे प्रमाण कमी असलेने दुष्काळ पडतो व पिण्यासाठीही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. सन 2019 मध्ये 89 गावे 752 वाडया वस्त्यावर पिण्यासाठी 114 टँकरव्दारे पाणी पुरवठा केला होता.
सन 1995 साली जत तालुक्याचा म्हैसाळ योजनेत समावेश करून 21400 हे. क्षेत्र ओलीताखाली येऊन 16 लघुपाटबंधारे तलाव व संख आणि दोड्डनाला मध्यम प्रकल्प भरून देण्याची तरतूद करणेत आली. परंतू आवश्यक तेवढा निधी न दिल्याने योजना पुर्ण होऊ शकली नाही. गेल्या चार वर्षात युती शासनाच्या काळात खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून निधी येवून काही अंशी कामे झाली आहेत. याच कालावधीत 178 कोटी रूपये खर्च करून 438 किमी पार्टपलाईन टाकणेचे काम प्रगथीपथावर आहे. तरीही पुर्ण 48 गावे अंशतः 17 गावे पाण्यासापासून वंचित आहेत.
या 65 गावासाठी पाटबंधारेच्या अधिकाऱयांनी खासदार संजयकाका पाटील तत्कालीन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष यांचे सुचनेवरून दि. 3 फेब्रुवारी 2019 रोजी अंकलगी येथे विस्तारीत म्हैसाळ योजना जत भाग, या योजनेचे सादरीकरण केले होते. या योजनेस फक्त 600 कोटी रूपये खर्च अपेक्षित असून जवळपास 64000 हे. क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. सदरची योजना मापदंडात बसत असलेने व या योजनेच्या माध्यमातून पावसाळयात वाहून जाणारे पाणी उचलून सर्व तलाव भरले व ओढया नाल्यातून पाणी सोडले तरी संपूर्ण जत तालुक्याला दुष्काळाची झळ बसणार नाही.
पावसाअभावी प्रत्येक वर्षी तालुक्यात टँकर, चारा छावण्या इत्यादीसाठी जवळपास चाळीस ते पन्नास कोटी रूपये खर्च होतो म्हणून या योजनेस मान्यता देऊन लवकरात लवकर काम पूर्ण केल्यास जत तालुका कायम आपला ऋgणी राहील. कै. राजारामबापू पाटील यांचे जत वरती प्रेम होते. त्यांचाही मानस जतच्या शेवटच्या टोकाला पाणी देण्याचा होता तो आपण पूर्ण करावा.
विस्तारीत म्हैसाळ योजना जत भाग याचे ढोबळ अंदाजपत्रक नकाशे व आराखडे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री नलवडे व अधिक्षक श्री गुणाले साहेब यांचेकडे तयार आहेत सदर योजनेस त्वरीत मान्यता देऊन जत तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक पुसून टाकावा.