ओबीसी मेळाव्यात माजी प्राचार्य राजेंद्र कुंभार यांचे आवाहन
कोल्हापूर / प्रतिनिधी
नॅशनल सर्व्हे ऑफ इंडियाने गतवर्षी देशातील गाढवांची मोजणी केली. यातून देशातील गाढवांची संख्या 31 टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले. या देशात जनावरांची गणना होते, तर ओबीसींची मागणीनुसार जातवार जनगणना होत नाही, हे दुदैव आह. शिवाय जनगणना करावी, असे ना केंद्र सरकार वाटते ना स्वाय्यत जनगणना आयोगाला वाटते. त्यामुळे आता कोल्हापूर जिह्यातील ओबीसी बांधवांनी जनगणना आयोगाला तब्बल 1 लाख पत्रे पाठवून जातवार जनगणना करण्यास भाग पाडावे, असे आवाहन माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी रविवारी केले.
बसंत-बहार रोडवरील वैश्यवाणी समाज बोर्डींगमध्ये सुरु केलेल्या ओबीसी जनमोर्चा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व ओबीसी समाज मेळावा अशा कार्यक्रमात ते बोलत होते. ओबीसी सेवा फाऊंडेशन व ओबीसी जनमोर्चाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वैश्यवाणी समाज बोर्डींगचे अध्यक्ष सुरेश कोरगावकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मेळाव्याचे आयोजन केले. अध्यक्षस्थानी माजी महापौर नंदकुमार वळंजू होते. मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी प्रास्ताविक करताना ओबीसींच्या मागणीला सत्यात उतरवायचे असेल तर सर्वांना एकत्र येऊन आर या पारची लढाई करावी, असे सांगितले. माजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले, ओबीसींना मागणी पदरात पाडून घ्यायची असेल तर ओबीसी समाज बांधवांना एकत्र यावेच लागेल. असे जर केले नाही तर त्याचे परिणाम नव्या पिढीला भोगावे लागतील. माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, ओबीसींच्या मागण्यांचा मुद्दा पुढे आला की सरकार झोपेचे सोंग घेते. अशा सरकारला आता सोंगं घेण्याचं बंद करा असे ठासून सांगावे लागेल.
मोहामेडन एज्युकेशन सोसायटी चेअरमन गणी आजरेकर म्हणाले, ओबीसी समाज बांधवांनी मागण्यांबाबत एकच धोरण ठरवून त्यानुसार सरकारविरोधात लढा द्यावा लागेल. रेखा परमाळे यांनी ओबीसींची जातवार जनगणना करण्यासाठी घराघरात जागृती केली जावी, असे सुचवले. माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी सांगितले की सरकारकडून ओबीसींमध्ये फुट फाडण्याचा डाव रचला जाऊ शकतो, तेव्हा ओबीसी समाज बांधवांनी जागृत रहावे. डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, ओबीसीची जातवार जनगणना 1931 साली झाली होती. त्यानंतर आजतागायत जनगणनाच झाली नाही. शिवाय ओबीसींनी जनगणना का झाली नाही, अशी विचारणा केलेली नाही. देशात गतवर्षी गाढवांची गणना झाली, पण ओबीसींची जनगणना करावी, असे ना सरकारला वाटते ना जनगणना आयोगाला वाटते. त्यामुळे आता ओबीसी जनगणना आयोगाला भाग पाडण्यासाठी वैचारिक लढाईही करावी लागेल. त्यासाठी आधी घरात वैचारिक वातावरण निर्मिती करावी लागेल. एकदा का घराघराला वैचारिक अधिष्ठान लाभले की क्रांती घडायला वेळ लागत नाही, असेही कुंभार म्हणाले. असद नदाफ, शिवाजी कदम यांचे भाषण झाले. यावेळी माजी नगरसेवक राहूल चव्हाण, महेश वासुदेव, भरत लोखंडे, संभाजी पोवार, विलास लोहार व बाबासाहेब काशीद आदी उपस्थित होते. यावेळी ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी स्वागत केले. रुपाली सातार्डेकर यांनी सुत्रसंचालन केले. ऍड. किशोर नाझरे यांनी ओबीसी एकतेची उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. संभाजी पोवार यांनी आभार मानले.