पूर, वादळ, दंगल किंवा तत्सम आपत्ती आली की जनजीवन विस्कळित होते. काही काळाने संकटाचा जोर ओसरतो आणि जनजीवन पूर्वपदावर येते. ‘जनजीवन सुरळित’, ‘जनजीवन पूर्वपदावर’, नागरिकांच्या स्पिरीटला सलाम’ वगैरे लाडक्मया हेडलाईन्स देऊन वृत्तपत्रे आपली पाने सजवतात.
तूर्तास कोरोनाचे संकट अजून शमलेले नाही. त्याची काळी सावली घोंघावते आहे. पण कोरोनाच्या निमित्ताने प्रशासनाने आणलेले नवनव्या नियमांचे संकट थोडे टळले आहे. तस्मात जनजीवन अगदी पूर्ववत झाले नसले तरी पूर्वपदावर आले आहे. गेले शंभर दिवस प्रशासनाने नुसता वैताग आणला होता. रोज नव्या सूचना. टीव्हीवरून मुख्यमंत्री धीर देत. आयुक्त सूचना देत. पोलीस वेगळय़ा सूचना देत. कुठेतरी अमुक दुकान उघडल्याची रोमहर्षक वार्ता किंवा अफवा कानी आली की धावत सुटायचे, तिथे रस्त्यावर आखलेल्या रिंगणात उभे रहायचे. पूर्वी सिनेमाचे तिकीट काढताना रांगेत आपला नंबर आला की तिकीटे संपायची, तसेच इथेही आपला नंबर आला की नेमके पोलीस येऊन दुकान बंद करायला भाग पाडायचे. मग आयुक्तांनी जाहीर केलेली वेळ कोणतीही असो. असो. 1962 आणि 1965 साली झालेल्या युद्धांच्या वेळी गव्हासाठी, मिलोसाठी, लिसा साखरेसाठी, केरोसिनसाठी रेशन दुकानांवर स्वारी करायची आणि दुकानाच्या बंद फळीसमोर तास न् तास रांगा लावायचो त्या आठवणी आल्या. त्यावेळी रांगेतली माणसं एकमेकांना युद्धाच्या ऐकीव बातम्या सांगत. आपल्या लोकांनी त्यांचे लोक खलास केले, शहराच्या अमुक भागात शत्रूचे छत्रीधारी सैनिक उतरले आहेत, वगैरे.
आता लॉकडाऊन सैल झाला आहे. पहाटे दूध आणायला गेलो होतो. सगळीकडे नाकांवर ओठांवर रंगीबेरंगी, कृष्णधवल मुखपट्टय़ा बांधलेली माणसे. पण काहींनी मुखपट्टय़ा हनुवटीखाली सरकवल्या होत्या. स्टायलिश लोक जसे गॉगल्स डोळय़ांच्या वर केसांमध्ये सरकवतात तसे. नवयुवती मुखपट्टीऐवजी ओढणी ओठांभोवती लपेटून चाललेल्या, महिला वर्ग पदराचा शेव नाकाओठांवर धरून भाजीवाल्याशी घासाघीस करीत होत्या. एका अमृततुल्यसमोर चार मित्र मुखपट्टय़ा खाली सरकवून कागदी कपात चहाचा आस्वाद घेत होते. घरी परतताना एका कर्कश्श आवाजाने दचकून मी रस्त्याच्या कडेला धावलो. आधी वाटले, पोलिसांची गाडी किंवा रुग्णवाहिका आहे. पण तसे नव्हते. तीन विचित्र केशभूषाधारी तरुण सायलेन्सर काढलेल्या बाईकवरून सुसाट गेले होते. जनजीवन पूर्वपदावर आल्याची खात्री पटली.