कोरोनाचा धुमाकुळ सर्वत्र सुरूच आहे. सध्या अनलॉक सुरू असला तरी कोरोनाची दहशत अजून काही थांबलेली नाही. आपल्या शेजारील देश चीन, पाकिस्तान व नेपाळ सीमेवर आपल्याला त्रास देत आहेत. खरीप हंगामाला दमदार सुरूवात झाली आहे. गेल्या दोन दिवसाच्या जोरदार पावसाने मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली आहे. कोरोनावर लस येणार अशी आशा दिसते आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. एकादशी, बेंदूर, गुरुपौर्णिमा असे सण, उत्सव, प्रथा, परंपरा आल्या गेल्या. समोर असलेले नागपंचमी, बकरी ईद, गणेशोत्सव साजरे होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. कोरोनाची महामारी, सीमेवरचा तणाव आणि महापुराची, अतिवृष्टीची भीती यामुळे सारेच तणावात आहेत. एकूणच भय इथले संपत नाही हे मात्र खरे. रविवारी गुरुपौर्णिमा साजरी झाली. भारतीय परंपरेत गुरुपौर्णिमेला आणि गुरुला अनन्य साधारण महत्त्व आहे. शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट, औदुंबर, नरसोबावाडी, त्र्यंबकेश्वर, गोंदवले अशी असंख्य मंदिरे गुरुपौर्णिमेला भक्तांनी गजबजलेली असतात. गायन क्षेत्रात तरी गुरुपरंपरा व गायन घराणी यांना कमालीचे महत्त्व आहे. अध्यात्म क्षेत्रातही गुरुला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि ते स्वाभाविक आहे. मानवी जीवनाला आकार देण्याचे काम गुरु करतात मग बालवाडीत मुळाक्षरे गिरवून घेणारे शिक्षक असोत, कलासाधना शिकवणारे शिक्षक असोत, अथवा एखाद्या क्षेत्रात तपश्चर्या करून विद्यार्थी घडवणारे महागुरु असोत किंवा स्वतःच्या वर्तनातून धडा देणारे आचार्य असोत. गुरु ज्ञानरूपी वसा देतात आणि त्यातून आपल्या जीवनाला आकार येतो अशी भारतीयांची धारणा आहे. शाळा, महाविद्यालये, मठ, आश्रम, देवालये, धार्मिक स्थळे, विद्यापीठ इथे जसे गुरु भेटतात तसे उघडय़ा शाळेत, जगाच्या शाळेतही अनेक गुरु भेटतात आणि त्यांचे मार्गदर्शनही आपल्या जीवनासाठी फार मोलाचे असते. ओघानेच गुरुपौर्णिमा हा ज्ञानमार्ग दाखवणाऱया प्रत्येकाचा सन्मानाचा दिवस असतो. आई ही तर प्रत्येकाची आद्यगुरु असते. पिता हा सुद्धा गुरु असतो. यंदा लॉकडाऊनमुळे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला मर्यादा आल्या. देवळे बंद, आश्रम बंद, जिल्हा बंदी पण. या साऱयातून मानसपूजा साधत माणसे गुरुपुढे नतमस्तक होत होती आणि कोरोना संकटातून जगाची सुटका व्हावी अशी प्रार्थना करताना दिसत होती. जगभर कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसतो आहे. कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी बारा लाखावर गेली आहे. कोरोना बळींची संख्या साडेपाच लाखावर पोहोचली आहे. भारतातही 18 हजार जणांचे बळी गेले आहेत आणि साडेसहा लाखावर रुग्णसंख्या गेली आहे. आगामी जुलै, ऑगस्ट हे पावसाचे दिवस आणि पावसाळय़ात थंडी, ताप, खोकला, फ्लू आदी आजाराची साथ असते. त्यामुळे कोरोना भीतीत ही भीती वाढली आहे. सुदैवाने अन्नटंचाई वा औषध टंचाई नाही. तथापि, कोरोनाची धास्ती आणि रोज वाढणारी रुग्णसंख्या धडकी भरवत आहे. एकीकडे ही भीती दुसरीकडे युद्धाचे ढग, तिसरीकडे पावसाळा, आणि त्यातच मंदी, बेरोजगारी, महागाई, यामुळे माणसाला जगणे कठीण होते आहे. कोरोनाचा दणका म्हणून अनेक उद्योग, व्यवसाय बंद आहेत. सध्याच्या संकटातही जे तग धरून आहेत ते अडचणीत आहेत. सरकारी तिजोरीतही ठणठणाट आहे. सरकारी नोकरांचे पगार करायला कर्ज काढावे लागणार अशी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची अवस्था आहे. पैसे नसल्याने बुलेट ट्रेनचा प्रकल्प रेंगाळणार अशी चर्चा आहे. मुंबई, पुणे, दिल्ली अशी महानगरे कोरोनाच्या सापळय़ात घट्ट अडकल्याने अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. गरिबांचे जीणे कठीण झाले आहे. अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. शहरातून गावात आलेल्यांचे प्रश्न याहूनही वेगळेच आहेत. सर्वांनाच समस्यांचा विळखा पडला आहे. काही भारतीय कंपन्यांनी स्वातंत्र्यदिनापर्यंत कोरोनावरची लस बाजारात आणू असे म्हटले आहे. बेळगाव, पुणे, हैद्राबाद आदी ठिकाणी त्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावर अजूनपर्यंत जालीम औषध मिळालेले नाही. पण, कोरोनाचे संकट असे आहे की त्यातून सुटका व्हावी, मुक्तता मिळावी यासाठी सारे जग आतुरलेले आहे. शाळा सुरू झाल्या आहेत. पण, केवळ म्हणण्यापुरत्या, ऑनलाईन शिक्षण आणि ऑन लाईन व्यवहार, सभा, बैठका, संवाद असा नवा फंडा रूढ होतो आहे. कोरोना पूर्वीचे जग आणि कोरोनानंतरचे जग असे दोन टप्पे स्पष्टपणे दिसू लागले आहेत. आणि या नव्या जगालाही अनेक नखे, काटे, ताप, व्याप आणि बऱयावाईट बाजू आहेत. माणसे भाकरीच्या भुकेच्या मागे धावताना या नव्या जगात स्वतःचे स्थान, स्वतःचा श्वास शोधताना दिसत आहेत. पण, सारेच अंधकारमय आणि अनिश्चित आहे. चांगली शिकली सवरली, नोकऱया करणारी माणसे कोरोनाच्या एका फटक्याने रस्त्यावर आली आहेत. या संकटात एकमेकांना मदत करणारी माणुसकी जशी दिसते आहे तशी संकटाचा लाभ घेत ओरबडणारी वृत्तीही बळावली आहे. ओघानेच भय संपत नाही हेच खरे, यंदा पाऊस बरा झाला आहे. खरीपाच्या पेरण्या बऱया झाल्या आहेत. पण, तेथेही बोगस बियाणे, महाग खते, औषधे, लिंकींग अशी ओरबडणारी प्रवृत्ती कार्यरत आहे. संकटातही माणसांना सुविचार, सुबुद्धी होत नाही यासारखे दुर्दैव ते कोणते पण, स्पर्धा, चंगळवाद, नवी अर्थव्यवस्था यांचे हे दोष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या सीमेवर जात भारतीय जवानांचे मनोबल वाढवत चीनला व भारताच्या शत्रूंना जो इशारा दिला आहे तो महत्त्वाचा आहे. आता विस्तारवादाचे नव्हे तर विकासवादाचे दिवस आले आहेत हे मोदींचे वक्तव्य अनेक अर्थांनी सूचक आहे. आगामी काही महिने कसोटीचे, संकटाचे आणि परीक्षा घेणारे ठरणार आहेत. अशावेळी एकसंधपणे या संकटाला सामोरे जात विकासवादात अग्रेसर आणि आत्मनिर्भर होणे महत्त्वाचे पण, आज घडीला भय इथले संपत नाही हेच खरे.
Previous Articleजनजीवन पूर्वपदावर
Next Article कोल्हापूर जिल्हय़ात २४ पॉझिटिव्ह
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.