नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा आरोप, आमदार योगेश कदमांच्या उपदेशाची गरज नाही, घरडा कोविड सेंटर बंद करण्याचा खटाटोप कशासाठी?
प्रतिनिधी / खेड
आजवर शहरातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत शिवसेना नगरसेवकांनी नेहमीच बहुमताच्या बळावर नकारघंटा वाजवली. सेनेच्या विरोधामुळेच विकासकामांना खीळ बसली असून जनतेबद्दल जराही आस्था नसणाऱया आमदार योगेश कदम यांनी उपदेशाचे डोस पाजण्याची अजिबात गरज नाही, असा टोला नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला.
ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले सात महिने जनतेसाठी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करताना जनतेच्या आरोग्याच्या अन् हिताच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. यासाठी बऱयाचवेळा राजकीय विरोधही झाला. मात्र कोरोनाच्या संकटात सलग दोन महिने घरी बसून जनतेबद्दल कुठल्याच प्रकारची आस्था न दाखवणारे फुकटचे सल्ले देऊन राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवसेना नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर जनतेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या सर्वच निर्णयांना विरोध करत सर्वसाधारण सभेत ठराव फेटाळून लावण्याचेच काम केले आहे. यामागचे बोलवते धनी आमदार योगेश कदमच असून त्यांच्या सांगण्यानुसारच सेना नगरसेवक जनहितकारक ठरावांना विरोध दर्शवण्याचे काम करत आहेत. सेना नगरसेवकांच्या नकारात्मक भूमिकेमुळेच विकास कामात खोडा पडत असल्याचेही स्पष्ट केले.
नगरपरिषद दवाखान्यातील कोविड सेंटरलाही शिवसेना नगरसेवकांनी विरोध दर्शवत जनतेच्या भावनांशी खेळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तसेच परवानगी मिळू नये, यासाठी दबावतंत्राचा वापरही करण्यात आला. ही जनतेची घोर फसवणूक असून जनतेबद्दल जराही आस्था नसणाऱयांना आगामी निवडणुकीत जनताच योग्य ती जागा दाखवेल. विकासकामांना खो घालणाऱयांनी फुकटचे सल्ले देऊ नये, असेही ठणकावले.
कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता तज्ञांनी वर्तवल्या आहेत. अशाही परिस्थितीत लवेल येथील घरडा महाविद्यालयातील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. हे कोविड सेंटर बंद करण्याचा खटाटोप कशासाठी? असा सवाल उपस्थित करत नगरपरिषद दवाखान्यातील कोविड सेंटर चार-पाच दिवसांतच जनतेसाठी खुले होईल, असेही स्पष्ट केले. काँग्रेसने केलेल्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, काँग्रेस शिवसेनेकडून सुपारी घेऊनच सातत्याने विरोधाचा डांगोरा पिटताना जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा टोलाही लगावला.
याप्रसंगी शहर विकास आघाडीचे गटनेते भूषण चिखले, नगरसेवक विश्वास मुधोळे, अजय माने, तौसिफ खोत, इलियास खतीब, नगरसेविका जयमाला पाटणे, मानसी चव्हाण आदी उपस्थित होते.