प्रतिनिधी/सांगली
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनलॉक नंतर सर्व व्यवहार सुरु झाल्याने पुन्हा गर्दी वाढत आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका ही वाढत असल्य़ाची चिन्हे आहेत. यातच आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री पाटील यांनी स्वत: ट्विट करत यासंबंधी माहिती दिली. मंत्री पाटील यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाल्याने अनेकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मंत्री पाटील यांनी आपल्य़ा ट्विटमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहन केले आहे.
राज्यातील अनेक प्रमुख नेतेमंडळी कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडत आहेत. याआधी गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
तर, महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,787 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 76 हजार 093 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 631 एवढा आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवून अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे. अन्यथा कोरोना रुग्णांचा हा आलेख वाढत गेला तर नागरिकांना पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.