जांबोटी/ वार्ताहर
जांबोटी ओलमणी परिसारत गेल्या आठ दिवसांपासून गवीरेडय़ाचा उपद्रवामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून त्यांच्याकडून भात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे.
जांबोटी परिसरातील जंगल प्रदेशामध्ये गवीरेडय़ांच्या कळपाचे मोठय़ा संख्येने वास्तव्य आहे. त्यांच्याकडून अगदी दिवसाढवळय़ा देखील शेतकऱयांच्या भात पिके फस्त होत असल्यामुळे शेतकरीवर्गाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिसरातील जांबोटी, वडगाव, ओलमणी, दारोळी आदी गावच्या शेतवडीमध्ये त्यांनी अक्षरशः हैदोस घातल्यामुळे भातपिके जमिनदोस्त होत आहेत. चालूवर्षी या परिसरात भातपिकांसाठी अनुकूल पाऊस होत असल्यामुळे भात पिके बहरली आहेत. मात्र गवीरेडय़ांचे कळप भात पिके फस्त करीत असल्यामुळे भात पिकांची वाढ खुंटली आहे. गेल्या चार दिवसांपुर्वी जांबोटी नजिकच्या कारगिळी शेतवडीत गवीरेडय़ाच्या कळपांनी धुमाकूळ घालून सुब्रराव कळ्ळेकर, रत्नाकर देसाई, प्रशांत देसाई, मुकूंद हवालेदार, दत्तात्रय कळ्ळेकर, विठ्ठल देसाई, सुरेश देसाई, शंकर देसाई आदी शेतकऱयांच्या भात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच दारोळी, ओलमणी गावच्या शेतवडीतील भात पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान केल्यामुळे गवीरेडय़ाच्या कळपापासून पिकांचे संरक्षण कसे करावे असा प्रश्न शेतकरीवर्गांना भेडसावीत आहे. वनखात्याच्या अधिकारीवर्गानं लक्ष घालून या भागातील गवीरेडय़ाचा वाढता उपद्रव थोपविण्यासाठी उपाय योजना करावी व नुकसानग्रस्त शेतकऱयांनी आर्थिक भरपाई मंजुर करावी अशी मागणी होत आहे.