माजी आमदार बाळ माने यांची जिल्हा नियोजनकडे मागणी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जाकीमिर्या पाटीलवाडी आणि शेटय़ेवाडी या बंधार्याच्या दुरुस्तीकरिता निधी प्राप्त न झाल्याने मिर्यावासीय आज शुक्रवार दि. 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकार्यांना जाब विचारायला जाणार होते. परंतु या होणार्या जिल्हा नियोजन समितीची बैठकीत या निधीला मान्यता मिळेल व त्वरित काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत येत्या काही दिवसांत परत धडक देऊ, असा इशारा माजी आमदार बाळ माने यांनी दिला आहे.
माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली मिर्यावासीय जिल्हाधिकार्यांना भेटणार होते. परंतु उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनची बैठक होणार आहे. एकूण साडेतीन किलोमीटर लांबीपैकी पाटीलवाडी आणि शेटय़ेवाडी जाकीमिर्या या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करण्यासंदर्भात पत्तन अभियंत्यांनी प्रस्ताव दिला होता. परंतु यापूर्वीच झालेल्या जय हिंद चौक आणि तावडे यांच्या घराजवळील बंधार्याच्या कामाचा या मागणीशी संबंध नाही, असे बाळ माने यांनी सांगितले.
यामुळे जिल्हा नियोजन विभाग त्यासंदर्भात दिशाभूल करत आहे.
तथापी, आजच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पाटीलवाडी व शेटय़ेवाडीमधील पत्तन अभियंता विभागाने दिलेल्या प्रस्तावाला निधीला मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा माने यांनी व्यक्त केली. त्यामुळे आजची धडक काही कालावधीसाठी पुढे ढकलली आहे, असे ते म्हणाले.
बंधार्याला निधी मिळण्याकरिता. माने यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र दिले होते. जानेवारीत दुरुस्तीला मंजुरी मिळूनही सात महिन्यांत निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दुरुस्ती काम रखडले व या पावसाळ्यात पाटीलवाडी, शेटय़ेवाडीतील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून राहावे लागले. निधी का व कुठे अडकला, याचा जाब विचारण्यासाठी मिर्यावासीय जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजनच्या अधिकार्यांना भेटणार होते. परंतु आजच्या बैठकीत ठोस निर्णय होईल, अशी आशा ग्रामस्थ बाळगून आहेत.