केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन, मुरगाव बंदरातील प्रुझ टर्मिनलमध्ये ‘दी पायर’ रेस्टॉरन्टचे उद्घाटन,
प्रतिनिधी /वास्को
गोवा हे जागतीक पर्यटन क्षेत्र आहे. गोमंतकीयांची जागतीक प्रतिमाही चांगली आहे. पर्यटनामध्ये विकास साधत असतानाच स्थानिक लोकांनी प्रतिमाही जपलेली आहे. त्यामुळे देशी विदेशी पर्यटकांना गोवा हवा हवासा वाटतो. केद्रीय पर्यटनमंत्री म्हणून आपल्या खात्याचा पर्यटन विकासासाठी गोव्याला निश्चितच लाभ होईल. मात्र, पर्यटनाच्या विकासासाठी साधनसुविधा उपलब्ध करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन, बंदर व जलमार्ग विकास तसेच जहाजोद्योग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
मुरगाव बंदरातील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमधील ‘दी पायर’ या तीन मजली रेस्टॉरंटचे उद्घाटन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी करण्यात आले. श्री नाईक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला सन्माननिय अतिथी म्हणून एमपीटीचे अध्यक्ष राजीव जलोटा तसेच गोव्याचे कॅप्टन ऑफ पोर्टस्चे कॅप्टन जेम्स ब्रांगाझा, एमपीटीचे उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय उपस्थित होते. तरूण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेव्टीव्ह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, आंग्रिया शिपिंगचे अध्यक्ष कॅप्टन नितीन धोंड, उपाध्यक्ष लीना कामत व्यासपीठावर उपस्थित होते.
पर्यटन, बंदर व जहाजोद्योग खात्यांचा गोव्यालाही लाभ होईल
रेस्टॉरन्टच्या उद्घाटनानंतर बोलताना केंदीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्यात पर्यटनाच्या विकासासाठी अशा साधनसुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे सांगून कॅप्टन नितीन धोंड यांनी पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ज्या ज्या ठिकाणी पर्यटन सुविधांची गरज आहे, त्या त्या ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात असे श्री नाईक म्हणाले. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. गोमंतकीयांनी पर्यटन व्यवसाय सांभाळताना गोव्याची प्रतिमाही जपलेली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही गोमंतकीय प्रीय आहेत. येणाऱया काळात गोव्यात पर्यटन व्यवसाय फोफावणारच आहे. केंदीय पर्यटनमंत्री म्हणून गोव्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी आपल्याकडून प्रयत्न होत राहतील. गोव्याला लाभलेल्या खात्याचा लाभ गोव्याला निश्चितच मिळेल. मात्र, पर्यटन विकासाच्यादृष्टीने साधनसुविधा उपलब्ध करण्याचे काम सर्वानीच करायला हवे असे श्री नाईक म्हणाले. पर्यटन व्यवसाय हंगाम आता सुरू होणार आहे. त्यासाठी अपण सज्जता ठेवायलाच हवी. ‘द पायर’ हे रेस्टॉरन्ट या तयारीचाच भाग आहे. गोव्यात पर्यटनाशी संबंधीत काही प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहेत असे केंद्रीयमंत्री नाईक म्हणाले. आपल्याला लाभलेली बंदर, जहाजोद्योग व जलमार्ग विकास ही खातेही गोव्यासाठी उपयुक्त असून जल उद्योगांचा विकास गोव्यातही होणे गरजेचे आहे. या उद्योगाच्या विकासासाठी अशा उद्योजकांना कर्ज स्वस्त असायला हवे. त्यामुळे उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. असे सागून श्रीपाद नाईक यांनी मुरगाव बंदरातील कंटेनर वाहतुक उद्योग पुन्हा जोमाने सुरू होईल असे स्पष्ट केले.
सार्वजनिक व खासगी भागीदारीतून प्रुझ टर्मिनलचा दोन वर्षांत विकास होणार- राजीव जलोटा
सन्माननिय अतिथी एमपीटीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी गोवा हे देशी विदेशी प्रुझ पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण असल्याचे सांगून मुरगाव बंदरातील कुज टर्मिनलला आता उपलब्ध सेवेमुळे महत्व येणार आहे. कोरोना ओसरतोय. त्यामुळे आंग्रिया देशी जल प्रवासीही सुरू होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुरगाव बंदराची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. कंटेनर वाहतुक सेवा अचानक बंद झाली. मात्र, ती पुन्हा कार्यरत होत आहे. ही सेवा अधिक जोमाने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना यश येईल. स्थानिक उद्योजकांनीही कंटेनर सेवा चांगल्या प्रकारे कार्यरत राहण्यासाठी माल उपलब्ध करावा असे आवाहनही त्यांनी केले. मुरगाव बंदरात आंतरराष्ट्रीय प्रुझ टर्मिनलचा विकास करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. दोन वर्षांत हा विकास होईल. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून हा प्रकल्प यशस्वी करण्यात येईल असे राजीव जलोटा म्हणाले.
सागरी उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन मिळायला हवे-किरण ठाकुर
तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेव्टीव्ह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक हे देवमाणूस असल्याचे सांगून अशी माणसे गोव्याच्या भूमीतच तयार होतात. गोवा हीच देवभूमी आहे. इथे समान नागरी कायदा आहे. तो देशभर असायला हवा असे ठाकूर म्हणाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपध्दतीचा उल्लेख केला. ते म्हणाले की समुद्रावर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. त्यासाठी मर्चंट नेव्ही ला प्रोत्साहन मिळायला हवे. जलमार्ग विकास, जल उद्योग विकास यांच्या अधिक लक्ष केंद्रीय व्हायला हवे. जहाजोद्योगांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या कर्जांवरील व्याज दरही कमी व्हायला हवेत असे किरण ठाकुर म्हणाले. समुद्राला आज मोठे महत्व आलेले आहे. त्यासाठी बंदरांचा विकास व्हायला हवा. नवीन बंदरे तयार व्हायला हवीत असे स्पष्ट करून त्यादृष्टीने ठाकूर यांनी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना उपयुक्त सुचना केल्या. सर्व प्रथम कॅप्टन नितीन धोंड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना त्यांची ओळखही करून दिली. लिना कामत यांनी अभार मानले.