पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती, कोल्हापूर जागतिक पर्यटन क्षेत्राच्या यादीत आणण्याचे प्रयत्न, पर्यटन आराखडय़ाची आखणी सुरु
प्रतिनिधी/कोल्हापूर
जागा†तक पर्यटनदिन 27 सप्टेंबरला होत आहे. त्या निमित्त 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सर्वसमावेशक पर्यटन आराखडय़ाची आखणी सुरु असून कोल्हापूर जिल्हा जागतिक पर्यटन क्षेत्रांच्या यादीत आणण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनामुळे हे कार्यक्रम यावर्षी केवळ निमंत्रितांसाठीच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिह्यातील पर्यटनाला चालना मिळवून देण्यासाठी व जिह्यातील पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने उपलब्ध खजिना सर्वांसमोर यावा, या दृष्टीने 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औाचित्य साधून जिल्हा प्रशासन व विविध संस्था यांच्यामार्फत दि. 26 सप्टेंबर ते 3 आॅक्टोबर या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कोरोनाच्या संक्रमणाचा विचार करुन सदर कार्यक्रमांचे नियोजन हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर केला जाईल. या आठवडय़ा दरम्यान 26 सफ्टेंबर हा कोल्हापूरांकरासाठी महत्वाचा असा दिवस आहे . या दिवशी 306 वर्षांपूर्वी करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी अंबाबाई च्या मूर्तीची पुन प्राणप्रतिष्ठापना झाली होती.
ते पुढे म्हणाले, जागतिक पर्यटन दिन हा आठवडाभर विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे, ज्याची सुरुवात मान्यवर चित्रकारांची व शिल्पकारांच्या प्रात्यक्षिकाने होईल. विविध उपक्रम व कार्यक्रम करवीरनिवासिनी पुन प्राणप्रतिष्ठापना दिन वर्धापन सोहळा , डेस्टिनेशन कोल्हापूर लोगो चे अनावरण , जिल्हा पर्यटन वेबसाईट चे अनावरण, जिल्हा पर्यटन नकाशा चे अनावरण, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, व्हिडिओग्राफ स्पर्धा यांचे अनावरण, कोल्हापूर उत्सवांचे वेळापत्रक प्रकाशन, पर्यटन विकासासंदर्भात आॅनलाईन व्याख्याने, दुचाकी रॅली, दुर्ग भ्रमंती, जंगल भ्रमंती , ग्राम भ्रमंती , जल पर्यटन , कृषी पर्यटन व साहस पर्यटनाचे कार्यक्रम , स्वच्छता आभियान , हेरिटेज समिती तर्फे व्हिडिओ प्रकाशन, हस्तकला प्रात्यक्षिक, आॅफ रोड रॅली, हेरिटेज वाॅक आदी उपक्रम या दरम्यान राबाविण्यात येणार आहेत.
या उपक्रमामध्ये जिल्हा प्रशासनासोबत क्रेडाई, हाॅटेल मालक संघ, हेरिटेज कमिटी, पर्यटन महामंडळ, पुरातत्व विभाग, ट्रॅव्हल एजन्ट असोसिएशन, देवस्थान समिती, हिल रायडर्स अडव्हेंचर फौंडेशन, कोल्हापूर जिल्हा माऊंटनिअरिंग व अलाईड स्पोर्ट्स असोसिएशन, टूर आॅपरेटर्स, निर्मिती ग्राफिक्स तसेच विविध क्षेत्रातील अनेक अनुभवी व तज्ञ मान्यवरांचा सहभाग असणार आहे.
पर्यटन, गडकिल्ले, खाद्यसंस्कृतीने जिल्हा समृध्द
जिह्यामध्ये पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने बरीच जागातिक दर्जाची ठिकाणे आहेत. जिह्यात गड किले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे, वारसा स्थळे, संग्रहालये, पुरातत्व ठिकाणे, जंगले, वनराई, जैवविविधता, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उत्सव, शैक्षणिक, जल पर्यटन, ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, साहसिक पर्यटन, औद्योगिक पर्यटन, हस्तकला, खाद्यसंस्कृती या सर्वानी परिपूर्ण आहे.
…तर झेंडय़ाची देखभाल करण्यास शासन तयार
पोलीस गार्डन येथील देशातील क्रमांक दोनच्या 303 फूट उंचीच्या तिरंगा झेंडय़ाच्या देखभालीबाबत विचारणा केली असता, पालकमंत्री पाटील म्हणाले, या झेंडय़ाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ‘एनजीओ’कडे आहे. त्यांनी हा झेंडा शासनाच्या ताब्यात देण्याबाबत लेखी दिल्यास त्याची देखभाल करण्यास शासन तयार आहे. पर्यटकांची वर्दळ असलेल्या रंकाळा येथे हा झेंडा बसविला असता तर सोयीचे झाले असते.
पर्यटकांना अंबाबाईचे दर्शन वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न
करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन वेळेत मिळावे, अशी बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांची अपेक्षा आहे. त्यामुळे दररोज दर्शनासाठी येणाऱ्या स्थानिक भाविकांची कोणतीही अडचण न होता पर्यटकांना अंबाबाईचे वेळेत दर्शन होईल, या पध्दतीने प्रयत्न होणे गरजेचे आहेत. त्या दृष्टीने संबंधित विभागांशी चर्चा करुन नियोजन केले जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.