प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने अमलात आणलेले तीन जाचक कृषी कायदे रद्द करावेत. हलगा-मच्छे बायपास रस्त्याबाबत न्यायालयाने दिलेला आदेश प्रशासनाने मानावा आणि बायपासचे काम थांबवावे, यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱयांनी जिल्हाधिकारी, हेस्कॉमचे अधिकारी, कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडून त्यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकारने लागू केल्यानंतर त्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत असताना सरकार मात्र जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.
हलगा-मच्छे बायपास विरोधात शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना अधिकारी येऊन शेतकऱयांना नाहक त्रास देत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. न्यायालयाचा आदेश प्रत्येकाने मांडला पाहिजे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकार आणि प्रशासन न्यायालयाचा आदेश मानण्यास तयार नाहीत. तेंव्हा कोणत्याही परिस्थितीत हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी कोणत्याही अधिकाऱयाने तिकडे फिरकू नये, असे या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, प्रकाश नायक, राघवेंद्र नाईक, जयश्री गुरण्णावर, सत्याप्पा मल्लापूर, गणेश इळीगेर, राजू मरवे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.