प्रशासनाचे दुर्लक्ष : त्वरित दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कणबर्गी परिसरातील विकासकामांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, संभाजी चौक ज्योतिर्लिंग गल्लीच्या रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी करीत आहेत.
कणबर्गी परिसरातील तलावाचा विकास करण्यात आला. मात्र रहिवाशांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिसरात नागरी समस्या निर्माण झाल्याने रहिवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. कधी भटक्मया जनावरांची समस्या, तर तलावांमध्ये सोडण्यात आलेल्या सांडपाण्याची डोकेदुखी अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच जलवाहिनी फुटल्याने पाण्याची समस्या उद्भवत आहे. प्रवेशद्वारावर हायमास्ट उभारण्यात आला. मात्र हा हायमास्ट रात्रीच्या वेळी बंदच असतो. या नागरी समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जाते. पण याची दक्षता घेतली जात नाही. त्यामुळे कणबर्गी परिसरातील रहिवाशांना नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत तलावाचा विकास करण्यात आला. पण रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे संभाजी चौक ज्योतिर्लिंग गल्लीतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, नागरिकांना अडचणीमधून ये-जा करावी लागत आहे. रस्ता खूपच खराब झाला असून पावसामुळे खड्डय़ांमध्ये पाणी साचत असून वाहनधारकांना याचा त्रास होत आहे. किमान रस्त्यांवरील खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी होत आहे.