जांबवंताने अत्यंत प्रेमाने आपली कन्या जाम्बवंती व स्यमंतकमणी श्रीकृष्णाला अर्पण केले आणि आपण सेवक वृत्तीने कृष्णचरणी समर्पित झाला. जांबवंताने आपल्या कन्येची वात्सल्यपूर्ण अंतःकरणाने पाठवण केली. सुहृदांना निरोप दिला.
सुषुप्तीसमान सध्वान्तविवरिं । विवाहसंभ्रम स्वप्नापरी । सांडूनि जागृतिवत् बाहेरी । आला श्रीहरि विश्वात्मा । स्वप्नानुभावाची जे ज्ञप्ति। तेंवि घेऊनि जाम्बवती । जागृतिसमान पूर्वप्रतेति । पाहे श्रीपति विश्वात्मा । विवराबाहेरी योजनें चारी । स्वकन्येसहित कैटभारि । बोळवोनियां चरणांवरी । कमळापरी शिर ठेवी । नम्र मस्तकें करूनि स्तुति । चरण क्षाळिले अश्रुपातीं । म्हणे नेणती जाम्बवती। कृपामूर्ति पाळावी । तूं सर्वज्ञ सर्वगत । सर्वान्तरिंचें तुजला विदित । मी केवळ रंक अनाथ । झालों सनाथ पदलाभें । इत्यादि ऐकोनियां स्तवन । कृपेनें द्रवला श्रीभगवान । शंतमहस्तें पुसिले नयन । हृदयीं कवळूनि आळंगिला । मस्तकीं ठेवोनियां हात । राहवोनिया जाम्बवत । वनितारत्नेंसीं भगवंत । द्वारके त्वरित निघाला ।
जांबवंताची गुहा म्हणजे जणू गाढ झोप. या गुहेत श्रीकृष्ण शिरला. तिथे त्याचे जांबवतीबरोबर स्वप्नवत लग्न लागले. त्यातून तो जागृत अवस्थेप्रमाणे बाहेर आला. स्वप्नानुभवात जी जांबवंती प्राप्त झाली होती तिला सोबत घेऊन श्रीपति परमात्मा पूर्व जागृत अवस्थेत म्हणजेच गुहेबाहेर आला. आपल्या कन्येला निरोप देण्यासाठी जांबवंत गुहेबाहेर चार पावले आला. तिथे त्याने भगवंताच्या चरणावर आपले डोके ठेवले. डोळय़ातून अश्रू वाहू लागले. तो नम्रपणे साश्रूनयनांनी भगवंताला म्हणाला- प्रभो! माझी कन्या अजाण आहे. कृपया तिचा सांभाळ करावा. तू सर्वव्याप्त सर्वज्ञ आहेस. तुला सर्वकाही न सांगताच समजते. मी केवळ अनाथ आहे. तुझ्या चरणाचा दास आहे. त्याचे बोल ऐकून देवाच्या हृदयाला पाझर फुटला. त्याने स्वतःच्या हातांनी त्याचे अश्रू पुसले व त्याला हृदयाशी धरून घट्ट आलिंगन दिले. जांबवंताला आशीर्वाद दिला व जाम्बवंतीला सोबत घेऊन भगवान तातडीने द्वारकेकडे निघाले.
कृष्ण रिघाला ऋक्षविवरिं । जनपद यादव ठेविले द्वारिं । घोर दुर्गमीं कान्तारिं । न येतां हरि सचिन्त ते ।
भगवंताचें अनागमन । तेणें सर्वांचें मन उद्विग्न ।
जावों न शकती उपेक्षून। दार्ढ्यें करून राहिले ।
दाही दिशा अवलोकिती। कांहीं उपाय न चले म्हणती । सत्राजिताची हे दुर्मति । आम्हांभोंवती भाविन्नली ।
प्राण गेला ऋक्षविवरिं । जिवें प्रेतें विवरद्वारिं । ऐसें विलपती नानापरी । करिती अवसरी कृष्णाची। क्षुधेतृषेचे सोसूनि क्लेश । तेथ राहिले बारा दिवस। मग कृष्णाची सोडूनि आस । द्वारकापुरास ते गेले।द्वारकेमाजी घातली हाक । विवरिं निमाले यदुनायक । ऐकोनि जनपद करिती शोक । तोही नावेक अवधारा । स्यमंतकमणी शोधण्यासाठी कृष्ण जांबवंताच्या भयंकर गुहेत शिरले. त्यावेळी त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याच्यासोबत आलेले द्वारकेतील लोक गुहेबाहेरच थांबले होते. ते कृष्ण परत येण्याची वाट पहात होते. पण कृष्ण बराच काळ परतला नाही. तेव्हा ते चिंता करू लागले.
Ad. देवदत्त परुळेकर