परवा टीव्हीवर दाखवले की सोन्याचा भाव प्रचंड वाढला आहे. सोने खरेदी करणारे ग्राहकच नाहीत. तस्मात सोन्याच्या काही दुकानात चक्क कांदे विकायला ठेवले आहेत.
एका उन्मादक चित्रगीताच्या चालीवर पिठामध्ये तेल घाला म्हणत सामोशाची चुकीची रेसिपी सांगणारी स्त्री, अमुक तेलात तळलेले बटाटे वडे रोज खाऊन कोलेस्टेरॉलची पातळी राखणारा दिव्य नट आणि अमुक साबणाने आंघोळ करणाऱया पस्तीशीतल्या स्त्रीला षोडशवर्षा समजणाऱया पुरुषाच्या जाहिरातींनी वैताग आणलाय.
बार, लॉजेस किंवा जिथे गुन्हा घडू शकतो तिथेच पोलिसांचा वावर असतो. पण लॉकडाऊनमध्ये दुधाच्या आणि किराणा मालाच्या दुकानाबाहेर पोलीस (दुकानदारांना दुकान बंद करण्याची घाई करताना) दिसतात.
पाच वर्षातून एक दोनदा शपथविधी वगैरे होतात, तिथे विरोधी पक्षनेते गेल्याच्या बातम्या रोज ऐकतो-बघतो.
एका मंत्र्यांनी जाहीर केले की भारतातल्या सव्वाशे कोटी जनतेपैकी पंच्याऐंशी कुटुंबांना सरकारने मोफत रेशन वाटले. आम्ही या पंच्याऐंशी कोटीपैकी एकाही कुटुंबांचे सदस्य नसल्याने आम्हाला डिप्रेशन आले आहे. एका कुटुंबात किती सदस्य असतात या अवघड गणिताने आत्मविश्वासदेखील नष्ट झाला आहे.
शहरातल्या रस्त्यांवर वाहने दिसण्याऐवजी पशू-पक्षी दिसू लागले आहेत. दुचाकीस्वारांच्या मागे धावून त्यांना खाली पाडून चावणारी भटकी कुत्री दिसेनाशी झाली आहेत.
सोशल मीडियावर आप्तेष्टांहून अधिक संख्येने राजकीय नेत्यांची बाजू घेऊन एकमेकांशी भांडणारे उत्साही वीर आणि जातीय-धार्मिक वैमनस्य पेरतात असा संशय येणारे लोक भेटू लागलेत.
व्यवस्थित पेहराव करून सत्य घराबाहेर पायी निघण्याआधी पंख लावलेले असत्य जगाची प्रदक्षिणा करून आलेले असते असे म्हणतात. कोणत्याही रोगाची साथ आल्यावर त्या रोगाला प्रतिबंध करणारी लस आणि रोग बरा करणारे औषध ऍलोपथीने रीतसर तयार करून त्याच्या योग्य चाचण्या घेऊन बाजारात आणण्यापूर्वी इतर उपचारपद्धतीतली रामबाण असल्याचा दावा करणारी औषधे जगभर विकून झालेली असतात.
स्वाईन फ्लूची साथ आली तेव्हा ऍलोपथीचे औषध येण्याआधी निलगिरी तेलाने बाजी मारली होती.यंदा हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि आर्सेनिक अल्बम या दोघांत जोरदार चुरस चालू आहे