प्रतिनिधी / कोल्हापूर
अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्यावरून महापालिका आणि सर्व पक्षीय फेरीवाला कृती समिती यांच्यात संघर्ष सुरू असताना आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महाव्दार रोडवर चौकोणी पट्टे आखले आहेत. या रस्त्यावर सध्या अस्तित्वात असलेल्या फेरीवाल्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नव्या फेरीवाल्यांना आखलेल्या चौकोनात प्रतिज्ञापत्र सादर करे पर्यंत महापालिका स्वतःहून बसविणार नाही, अशा आशयाचे लेखी म्हणणे बुधवारी जिल्हा न्यायालयात महापालिकेच्या अधिकाऱयांनी सादर केले. लेखी म्हणण्यातील आशय पाहिला तर महापालिकेने सध्यातरी आपल्या भूमिकेवरून न्यायालयात यु-टर्न घेतल्याचे स्पष्ट झाले.
महाव्दार रोडवरील एका दुकानदार व्यापारी महेश सारडा आणि इतर सोळा व्यापाऱयांनी बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी आणि महाव्दार चौक ते साकोली कॉर्नर या रोडवरील दावा मिळकतीसंदर्भात 2019 मध्ये दावा दाखल केला होता. त्यावर पाचवे अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश पी. एस. विठलानी यांच्या न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी वादी सारडा यांचे वकील ऍड. किशोर नाझरे, ऍड. योगेश नाझरे यांनी युक्तीवाद केला तर महापलिकेच्या वतीने ऍड. प्रफुल्ल राऊत यांनी बाजू मांडली.
स्ट्रीट व्हेंडर ऍक्ट मधील तरतुदीनुसार धार्मिक स्थळांपासून शंभर मिटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही. मात्र बाहेरील रस्त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशानुसार फुल, रांगोळी, अगरबत्ती, पूजेचे साहित्य आदी देवाला अपर्ण करण्यासाठी आवश्यक वस्तूंच्या विक्री करणाऱया फेरीवाल्यांना विक्रीस परवानगी आहे. त्यामध्ये होजिअरी व इतर व्यवसायासंदर्भातील फेरीवाल्यांचा उल्लेख दिसून येत नाही. याचाच गैरअर्थ अंबाबाई मंदिर परिसरात कारवाई करताना काढण्यात आला. आहे. कायद्यानुसार अंबाबाई मंदिरापासून शंभर मीटरच्या बाहेरच्या रस्त्यावर पूजेचे साहित्य विक्री करण्यास फेरीवाल्यांना मुभा आहे. पण कोल्हापूर महापालिका शंभर मिटरच्या बाहेर पूजा साहित्य विक्री करणाऱया फेरीवाल्यांबरोबरच इतर फेरीवाल्यांनाही स्थलांतरीत करत आहे. त्यामुळे शंभर मिटर अंतराच्या बाहेरील दुकानदारांच्या दारात पांढरे चौकोन आखून त्या ठिकाणी फेरीवाल्यांना नव्याने बसविणार याबाबत व्यापाऱयांच्या वतीने या सुनावणीत युक्तीवाद करण्यात आला. महापालिकेने शंभर मिटरच्या बाहेर जे चौकोनी पट्टे आखले आहे ते कशासाठी? अशी विचारणा न्यायालयाने केल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या पत्रानुसार महाव्दार रोडवरील वाहतुकीचा शिस्त लागावी यासाठी चौकोनी पट्टे आखले आहेत. त्या ठिकाणी म्हणजेच वादींच्या दुकानाच्या दारात सध्या अस्तित्वात असलेल्या फेरीवाल्यांव्यतिरिक्त इतर नव्या कोणत्याही फेरीवाल्यांना महापालिकेच्या वतीने बसविण्यात येणार नाही, असे महापलिकेच्या वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने त्यावर अंडरटेकिंग अर्थात लेखी म्हणणे देण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेच्या इस्टेट अधिकाऱयांनी लेखी म्हणणे सादर केले. न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख 20 फेब्रुवारी देताना त्यावेळी चौकोनी पट्टे मारलेल्या जागी नवे फेरीवाले बसविणार की नाही या संदर्भात महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱयाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
चौकोनी पट्टे आणि महापालिकेची संभ्रम निर्माण करणारी भूमिका
अंबाबाई मंदिरापासून शंभर मीटर अंतराच्या आत असलेल्या फेरीवाल्यांना हटवून त्यांना महाव्दार रोड, ताराबाई रोडवर शंभर मीटर अंतराच्या बाहेर स्थलांतरीत करण्यासाठी महापालिकेने चौकोनी पांढरे पट्टे मारले आहेत. ते ताराबाई रोडवर मित्रप्रेम मंडळाच्या पुढील बाजूस आहेत तर महाव्दार रोडवर मेहता आणि कंपनी च्या पुढील बाजूस आहेत. पण आता न्यायालयात हे चौकोनी पट्टे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आखल्याचे महापालिकेने सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील (शंभर मिटरच्या आतील) फेरीवाल्यांना हटविल्यानंतर त्यांना पर्यायी जागा कुठे देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.