प्रतिनिधी /बेळगाव
येथील जिल्हा पंचायत कार्यालय आवारात नव्याने प्रशासकीय संकुले आणि उपाहारगृहाच्या बांधकामाचे काम सुरू आहे. कार्यालय आवारातील वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी याठिकाणी विशेष वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. पण हे काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याने या समस्या सुटणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अंदाजे 1 कोटी 50 लाखांचा निधी खर्चून जिल्हा पंचायत कार्यालयाच्या मागील भागात वाहनतळ, प्रशासकीय कार्यालय आणि उपाहारगृह बांधले जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या प्रकल्पाचे कामकाज सुरू असले तरी ते अत्यंत कूर्मगतीने सुरू आहे. कार्यालय आवारातील वाहनतळाची समस्या पाहता हे काम त्वरित पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, बांधकाम खात्याचे आणि कंत्राटदाराच्या दुर्लक्षेमुळे कामाला दिरंगाई होत असल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
सदर काम जलदगतीने पूर्ण करून किमान वाहनतळाची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱयांतून होत आहे.