सातारा : इतिहासाचे गाढे अभ्यासक, प्रसिध्द वक्ते व सातारा जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, रयतसेवक प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण (वय ७६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार केशव चव्हाण, बांधकाम व्यावसायिक सयाजीराव चव्हाण, मंगलमूर्ती हॉस्पिटलचे डॉ. जयदीप चव्हाण यांचे ते वडील होत.
मूळचे सातारा तालुक्यातील भाटमरळी येथील असलेल्या प्रा. डॉ. चव्हाण यांचा इतिहासाचा दांडगा व्यासंग होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की त्यांच्या आयुष्यातील प्रमुख युध्दप्रसंगांचा इतिहास सांगितला जातो. पण त्याच्या पलीकडे उत्तम प्रशासक, प्रजाहितदक्ष लोककल्याणकारी राजा, छत्रपतींचे महिलाविषयक धोरण, शेतकरीविषयक धोरण अशा विविध पैलुंवर त्यांनी अभ्यासपूर्वक प्रकाश टाकला. अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने होत असत.
सुरूवातीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत त्यांनी मुलांना घडवले. रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रदीर्घकाळ अध्यापनाचे कार्य केले. त्यामुळे रयतसेवक हे बिरुद त्यांनी अभिमानाने वागवले. आणि त्याच भूमिकेतून लोकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न किताब मिळावा यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत होते.
स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे तेराजकारणात सक्रीय होते. त्यांच्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. साधेपण त्यांनी कधीच सोडले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आदराची भावना होती. या लोकप्रियतेमुळे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ते शेंद्रे गटातून दिमाखात निवडून आले. परवाच गुढीपाडव्याला त्यांनी मतदारसंघातील पाच गावात विविध विकासकामांचा शुभारंभ केला होता.सतत जनमाणसात वावरणाऱ्या प्रा. डॉ. चव्हाण यांच्या आकस्किम निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. सामाजिक, राजकीयसह विविध क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. आज सकाळी संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.