जीवन प्राधिकरण गांधारीच्या भूमिकेत
प्रतिनिधी/ सातारा
सातारा कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषदेसमोर असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेसमोर गेल्या अडीच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. याबाबत परिसरातील व्यावसायिक सातत्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधत असताना प्राधिकरण मात्र गांधारीच्या भूमिकेत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दरम्यान, तात्काळ गळती न काढल्यास पाण्याची बिले न भरण्याचा इशारा परिसरातील व्यावसायिकांनी दिला आहे.
जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसमोर सुरेंद्र गुदगे यांच्या निवासस्थानाकडे जाताना वळणावर रत्यावरच पाईपलाईनला गळती लागली आहे. या घटनेला अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतानाही प्राधिकरणाचा एकही अधिकारी तिकडे फिरकला नाही.
गळती लागलेले पाणी या सर्व व्यावसायिकांच्या दारातून वाहत आहे. संबंधित व्यवसायिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जाधव नावाच्या कर्मचाऱयांशी संपर्क साधून गळती काढण्यास सांगितले. मात्र जाधव सातत्याने चकवा देत आहे. गळती काढण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या अडीच महिन्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. सध्या उन्हाळ्याचा तडाखा जाणवू लागला आहे.
दरम्यान, कृष्णा नदीत जेमतेम पाणी आहे. अशा परिस्थितीत दुर्लक्ष करून लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर यासारखे दुसरे दुर्दैव काय? संबंधित गळती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ताबडतोब काढावी अन्यथा पाणी बिल भरणार नसल्याचा इशारा परिसरातील व्यवसायिकांनी दिला आहे.