प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा बँकेचा निवडणुकीचा अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सोसायटी गटातून ऍड. उदयसिंह उंडाळकर यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे सादर केला. दुपारी 3 वाजेपर्यंत 18 जणांनी 55 अर्ज नेले होते. एक अर्ज 100 रुपयांना असून मतदारांनाच फक्त अर्ज दिला जात आहे. निवडणूक अर्ज स्वीकरण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दुसऱया मजल्यावर सुरु आहे. याच अनुषंगाने नेत्यांची वर्दळ सुरु झालेली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पहिला अर्ज ऍड. उदयसिंह उंडाळकर यांनी आपला अर्ज कार्यकर्त्यांच्या उपस्थित दाखल केला आहे. दि. 25 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे. दि. 26 रोजी छाननी असून अर्ज मागे घेण्याची तारीख दि. 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. दि. 11 रोजी सकाळी 11 वाजता चिन्ह वाटप होणार आहे. दि. 21 रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकारण्यास सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. दुपारी 3 वाजेपर्यंत 18 जणांनी 55 अर्ज नेले तर एकच अर्ज दाखल झाला. एका अर्जाची किमंत 100 रुपये असून आधारकार्ड किंवा ओळखीचा पुरावा असल्यानंतर मतदार यादीत नाव पाहूनच अर्ज दिला जात आहे. त्यामध्ये राजेश राजपुरे, अर्जुन खाडे यांच्यासारख्यांनी स्वतः अर्ज नेले आहेत. तर जिल्हा बँकेत जिह्यातील नेते मंडळींची गर्दी होत आहे.
आमदार शिवेंद्रराजे थर गाडीतून
आमदार शिवेंद्रराजे आज थर या गाडीतून जिल्हा बँकेतून आले. स्वतः ही गाडी चालवत आले. गाडीतून उतरुन परिस्थिती पाहून त्यांनी बँकेत अर्ज न्यायला आलेले राजेंद्र राजपुरे यांची भेट झाली. त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली.
अर्जुन खाडेंनी घेतले दोन अर्ज
अर्जुन खाडे हे अर्ज घ्यायला गेले तेव्हा त्यांना अर्ज देणाऱयांनी ओळखीचा पुरावा मागितला तर त्यांनी बँकेतल्या कर्मचाऱयांना कोणालाही सांगा असे त्या अधिकाऱयांना सांगितले. त्यावर त्या अधिकाऱयांनी ओळखीचा पुरावा म्हणजे आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायन्स आहे का जवळ अशी विचारणा करताच त्यांनी गाडीत आहे मागवतो असे सांगून ते दाखवले अन् त्यांनी अर्ज खरेदी केला.
उदयसिंह उंडाळकर यांनी कराड सोसायटींतून भरला अर्ज
स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनाखाली 1967 साली कराड सोसायटी मतदारसंघातून विलासराव पाटील (काका) यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला. सलग 11 वेळा याच मतदारसंघातून काका बँकेत संचालक राहिले. बँकेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष व मार्गदर्शक अशा भूमिका बजावत सातारा बँकेचा नावलौकिक देशभर वाढवला. स्व. चव्हाणसाहेब, स्व. आबासाहेब वीर यांनी घालून दिलेले आदर्श पुढे घेऊन जात बँकेच्या सर्वांगिण विकासात मोलाचे योगदान दिले. काका बँकेचे संचालक असतानाच 4 जानेवारी 2020 रोजी त्याचे निधन झाले. काकांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांची नियुक्ती सर्वानुमते ठरली. मात्र तोपर्यंत बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने काकांचा वारसा राजकारण, समाजकारणाबरोबर सहकारात चालवण्यासाठी उदयसिंह पाटील यांनीच काकांचे जागेवर निवडणूक लढवावी असा आग्रह कराड तालुक्याबरोबर जिह्यातील सहकार क्षेत्रातील नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी धरला होता. उदयसिंह पाटील यांनी यानुसार वरिष्ठ नेतेमंडळींच्या सल्ल्याने व कराड सोसायटी मतदारसंघातील मतदारांची चर्चा करून उमेदवारी निश्चित केली होती. पहिल्याच दिवशी जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज दाखल करत विलासकाकांचा वारसा व सेवा सोसायटय़ांशी असलेली बांधीलकी जोपासण्यासाठी उदयसिंह उंडाळकर सज्ज झाले आहेत.