कोल्हापूर विभागीय मंडळात सातारा जिल्हाच सर्वात अव्वल
सातारा / प्रतिनिधी :
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अत्त्यंत महत्वाची परिक्षा समजली जाणाऱ्या इयत्ता 12 वी चा निकाल मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास लागला. कोरोनामुळे प्रतिवर्षी प्रमाणे इयत्ता दहावीच्या निकालापूर्वी लागणारा यंदाचा 12 वीचा निकाल उशीरा लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये मंडळाच्या सुधारित कार्य पध्दतीनुसार हा निकाल लावण्यात आला. यंदा सातारा जिल्हाचा निकाल हा 99.91 टक्के इतका लागला आहे.
यंदा कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर या विभागात सातारा जिल्हा सर्वांत अव्वल ठरला आहे. सातारा जिल्हय़ातील एकुण 246 महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला असुन यंदा 35,619 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी 35,589 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परिक्षेत ही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा जिल्हय़ात मुलांमध्ये एकुण 18,695 विद्यार्थ्यांचे मुल्यांकण करण्यात आले होते. त्यापैकी 18,676 (99.89 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच मुलींमध्ये एकुण 16, 924 मुल्यांकण प्राप्त विद्यार्थीनींमध्ये 16, 913 (99.93 टक्के) विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदाचा हा कोल्हापूर विभागाचा निकाल कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूरचे विभागीय सचिव देविदास कुल्लाळ यांनी जाहीर केला आहे.
गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात 7.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लेखी परिक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाच्या आधारावरच निकाल जाहीर करण्यात आला आहे. कित्तेक पालक व विद्यार्थीवर्ग या निकालाची आतुरतेने वाट पहात होते. कारण पहिल्यांदाच इतक्या उशीरा निकाल लावण्यात आला आहे. आता निकाल लागताच संबंधीत विद्यार्थीवर्गांनी पुढील प्रवेशांकरीता हालचाली सुरू केल्या आहेत.