काँग्रेसची ट्रक्टर रॅली, स्वाभिमानीचा अंकली पुलावर रास्तारोको, शिरोली, हातकणंगले, किणी टोल नाका येथेही शेतकरी आंदोलन
प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी काळा कृषी कायद्याविरोधात किसना संघर्ष समितीच्यावतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा काँग्रेसच्यावतीने निर्माण चौक ते दसरा चौक या मार्गावर भव्य ट्रक्टर रॅली काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सांगली- कोल्हापूर मार्गावरील कृष्णा नदीवरील अंकली पुलावर रास्तारोको करण्यात येणार आहे. दरम्यान आंदोलनच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या ट्रक्टर रॅलीचे उद्घाटन महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते पालकमंत्री तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर अंकली पुलावरील आंदोलनाचे नेतृत्व समितीचे समन्वयक माजी खासदार राजू शेट्टी करणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समन्वय समितीचे सदस्य कॉ. नामदेव गावडे यांनी केले आहे.
काँग्रेच्या ट्रक्टर रॅलीस सकाळी 9 वाजता निर्माण चौक संभाजी नगर, येथून सुरुवात होईल तर दसरा चौक येथे सांगता होणार आहे. रॅलीमध्ये काँग्रेसचे आजी-माजी आमदार, तालुकाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी ट्रक्टरसह मोठÎा संख्येने सहभागी होणार आहेत.
शेतकऱ्यांचा अक्रोष सरकारपर्यंत पोहचवा
कृषी सुधारणा विधेयक विरोध डावलून केंद्राने मंजूर करुन घेतले. लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून भाजप सरकारने काळे कायदे आणले आहेत. या कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी आक्रोश करीत आहेत. त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचण्यासाठी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. – कॉ. नामदेव गावडे,- समन्वय समितीचे सदस्य अखिल भारतीय किसान संघर्ष समिती