प्रतिनिधी / सातारा :
मतदार नोंदणीसारखी सर्वव्यापी मोहीम राबवून घराघरात शासकीय खर्चाने चाचण्या करून निष्कर्ष काढा. हे निष्कर्ष जर दहा टक्क्यांच्या आसपास असतील तर लॉकडाऊनसारखे निर्णय जरूर घ्या. मात्र, भीतीने चाचणी करावयास आलेल्या किंवा कॅम्प राबवून नागरिकांच्या चाचण्यातून निघणारा निष्कर्ष हा तर्कहीन आणि अशास्त्राrय असल्याचे मत व्यक्त करत काही सातारकरांनी या लॉकडाऊनबाबत व्यवहार्य आणि व्यावहारिक भूमिका घ्या, अशी मागणी केलेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनबाबत असलेल्या लोकभावना ‘तरुण भारत’ ने निर्भिडपणे मांडल्याने जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनाविरुध्दच्या लढाईत सातारा जिल्हयातील नागरिकांनी प्रशासनाला डोळे झाकून सहकार्य केलेले आहे. काही बेशिस्त करणारे नागरिक सोडल्यास कोरोना विरुध्दच्या लढाईत झोपडीतील माणसांपासून बंगल्यातील सर्वच अबालवृध्दांनी नियम पाळून ही कोरोनाची पिडा लवकर टळू दे, अशी प्रार्थना करत घरात बसणे पसंद केले आहे. जे ऐकत नव्हते त्यांना पोलिसांनी फटकेही दिले आणि कोटय़वधी रुपयांचा दंडही वसूल केला आहे. काहींची वाहने तीन, तीन महिने पोलिसांची ताब्यात होती. लाखो जीव आज देखील घरात बसून आहेत.
सातारकर आता बोलू लागले
सातारा जिल्हय़ातील जनतेने प्रशासनाला सहकार्यच केलेले आहे. नुसते सहकार्यच नाही ज्यांनी नियमांचा भंग केला अशा छोटय़ा, मोठय़ा नागरिकांपासून ते सर्वांनीच महसूल विभाग, नगरपालिका, पोलीस प्रशासनाकडे कोटय़वधी रुपयांचा दंडही भरला आहे. याला बेशिस्त म्हणून माध्यमांनीही झोडपले आहे. पण हे कधीपर्यंत यालाही मर्यादा आहे, याचे भान प्रशासनाने ठेवण्याची गरज आहे. कारण आता सातारकर बोलू लागले आहेत. त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देतानाचा नागरिकांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे.