772 पैकी 497 तलावात पाणी नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हय़ातील अनेक तलावांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, देखभालीचा अभाव आणि तलावांमध्ये मोठय़ा प्रमाणात साचलेला गाळ यामुळे जिल्हय़ातील सुमारे 497 तलाव कोरडे पडले आहेत. जिल्हय़ात एकूण 972 तलाव असून यापैकी जवळजवळ अर्ध्या तलावांमध्ये थेंबभरही पाणी नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले व तलावात मोठय़ा प्रमाणात पाणी शिल्लक होते. मात्र उन्हाळा येताच अनेक तलावातील पाणी आटले आहे. देखभालीचा अभाव आणि तलावांतून साचलेला गाळ काढण्याकडे झालेले दुर्लक्ष यामुळे तलाव कोरडे पडले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जलामृत योजना आणि तलाव संजीवनी योजनेद्वारे जिल्हय़ातील तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. तलाव संजीवनी योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्याला 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि अन्य कारणांमुळे या योजनेला ब्रेक लागला आहे. पंचायतराज खात्याच्यावतीने जलामृत योजनेंतर्गत मागील वर्षी 190 तलावांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही या योजनेची पूर्तता झालेली नाही. यामुळे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव तुडूंब भरूनही यंदाच्या उन्हाळ्यात जिल्हय़ातील 497 तलाव कोरडे पडले आहेत. बऱयाच तलावांच्या आजुबाजुला अतिक्रमण करण्यात आले आहे. काटेरी झुडूपे आणि कुंपणांनी अनेक तलाव व्यापले आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत तलावातील गाळ काढण्याचे काम दरवर्षी हाती घेण्यात येत असते. मात्र या कामात पारदर्शकपणा नसल्याने दरवर्षी ही समस्या निर्माण होत आहे.
नरेगाअंतर्गत तलावांतील साठलेला गाळ आणि माती काढण्याचे काम होत असते. मात्र काढलेला गाळ तलावाच्या काठावरच टाकण्यात येत असतो. दरवर्षी पावसामुळे हा गाळ पुन्हा त्याच तलावात पसरतो. यामुळे ही समस्या कायमचीच बनली आहे. यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. तेव्हाच जलामृत आणि तलाव संजीवनी योजना खऱया अर्थाने यशस्वी होणार आहेत.