प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका प्रशासनाने घरपट्टी वाढीसह दुप्पट कचरा विल्हेवारी कर आकारण्यास प्रारंभ केला आहे. कचरा विल्हेवारी शुल्कच्या नावाखाली वर्षाकाठी 360 रुपये आकारणी करण्यात येत आहे. मात्र आता पुन्हा या कारणाकरिता प्रत्येक वर्षाला आणखीन 360 रूपये आकारणी करण्याचा सपाटा महापालिकेने सुरू केला आहे. त्यामुळे एन लॉक डाऊन काळात मालमत्ताधारकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
दर तीन वर्षांतून एकदा घरपट्टीत वाढ केली जाते. 15 ते 30 टक्क्मयापर्यंत घरपट्टी वाढविण्याची तरतूद महापालिका कायद्यात आहे. यानुसार यंदा 2020 – 21 या आर्थिक वर्षापासून रहिवासी मालमत्ता करिता 15 टक्के, व्यवसायिक मालमत्ता करिता 25टक्के आणि खुल्या जागांना 20 टक्के करवाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त हेल्थ सेस, लायब्ररी शुल्क, परिवहन शुल्क आणि बेग्गर शुल्क अशी 26 टक्के शुल्क आकारणी केली जाते. तसेच कचरा व्यवस्थापन शुल्क च्या नावाखाली प्रत्येक मालमत्ता धारकांकडून प्रति महिना तीस रुपये वसूल करण्यात येतात. ही आकारणी घरपट्टीच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे रहिवासी इमारत धारकांकडून वर्षाला 360 रुपये कचरा व्यवस्थापन शुल्काची आकारणी केली जाते. व्यवसायिक इमारतीकरिता प्रति वर्षाला 600 कचरा व्यवस्थापन शुल्क आकारला जातो. तसेच इमारतीच्या आकारानुसार कचरा व्यवस्थापन शुल्कात वाढ होते. हा शुल्क आकारण्यात येत असताना आता पुन्हा कचरा व्यवस्थापन सर्विस चार्ज च्या नावाखाली प्रति महिना चाळीस रुपये ते दीडशे रुपये पर्यंत वसुली करण्यात येत आहे. इमारतीच्या आकारानुसार आणि व्यवसायिक, औद्योगिक, रुग्णालय, हॉटेल अशा व्यवसायाच्या स्वरूपानुसार कचरा व्यवस्थापन सर्विस चार्ज आकारण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना 480 रुपयापासून हजार रुपया पर्यंत कचरा व्यवस्थापन सर्विस चार्ज भरावा लागत आहे. यापूर्वी कचरा व्यवस्थापन शुल्काच्या नावाखाली ही रक्कम भरून घेण्यात येत असताना पुन्हा सर्विस चार्जेच्या नावाखाली दुप्पट रक्कम आकारण्याचा सपाटा महापालिका प्रशासनाने चालविला आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱयांकडे चौकशी केली असता, सध्या कोरोना डय़ुटीवर असल्याने भेटता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण 30 मे पर्यंत घरपट्टी भरणाऱयांना पाच टक्के सवलत देण्यात येत असल्याने नागरिक घरपट्टी भरण्यासाठी धाव घेत आहेत. पण घरपट्टी वाढीबरोबर कचरा व्यवस्थापन शुल्काचा भुर्दंड भरावा लागत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लॉक डाऊन मुळे सर्व व्यवसाय आणि नोकरी सोडून घरात बसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अशावेळी वाढीव घरपट्टी आणि कचरा व्यवस्थापनाचा दुप्पट शुल्क आकारण्यात येत असल्याने संतापाची लाट पसरली आहे. घरपट्टी वाढ आणि कचरा व्यवस्थापन सर्विस चार्ज रद्द करावा अशी मागणी होत आहे.