प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ातील कायदा व सुव्यवस्था चोख रहावी व नागरिकांना निर्भयपणे जीवन जगता यावे यासाठी पोलीस दलाने कडक भूमिका घेतली आहे. त्यातूनच तीन टोळय़ांवर मोक्क्याचा प्रस्ताव पोलीस महानिरीक्षकांना पाठवण्यात आला होता. त्यांनी मंजुरी दिल्याने तीन टोळय़ांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. या टोळय़ांमधील 26 गुन्हेगारांना मोक्का लावण्यात आला असून त्यापैकी 12 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.
एकाच वेळी 26 गुन्हेगारांना मोक्का लागण्याची ही पहिलीच धडाकेबाज कारवाई एसपी अजयकुमार बंसल व अपर जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस एसपी बंसल यांच्यासह अपर जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ तसेच अधिकारी उपस्थित होते.
एसपी बंसल पुढे म्हणाले, जिह्यातील पोलीस ठाणे प्रभारी यांची बैठक घेवून सुपारी घेऊन खून, खून करण्यासाठी अपरहण करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी
चोरी, खंडणी असे आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करणारे गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. यामध्ये तीन टोळय़ांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
टोळी प्रमुख अक्षय लालासो उर्फ लालासाहेब पवार याने व त्याचे 2 साथीदार यांनी किन्हई गावचे हद्दीत फिर्यादी यांनी वाळू काढण्यासाठी मजूर पुरवण्यासाठी जिवे ठार मारण्याचे उद्देशाने देशी बनावटीचे पिस्टलमधून एक राऊंड फायर केला होता. गुह्यामध्ये तीन आरोपी असून अक्षय लालासो उर्फ लालासाहेब पवार यास अटक केलेली आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरु असून या टोळीने कोरेगाव तालुक्यात विविध प्रकाराचे 21 गुन्हे केले आहेत.
टोळी प्रमुख निखील प्रकाश वाघमळे (रा. अंबवडे ता. कोरेगाव) व त्याचे इतर 5 साथीदार यांनी ट्रक थांबवून, इंडोवर गाडीमधून खाली उतरुन, फिर्यादीने गाडी ठोकलेचा बहाणा करून ट्रकचालकास मारहाण करुन लुटले होते. याप्रकरणी निखिल वाघमळेला अटक करण्यात आला असून एक विधीसंघर्ष बालकाचा ताबा घेण्यात आलेला आहे. या टोळी विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहेत. सातारा तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून यातील दोन आरोपी अनोळखी आहे. त्यांच्यावरील मोक्काचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी पाठवला होता.
टोळी प्रमुख अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज) याने व त्याचे इतर 17 साथीदारांनी कट करुन आरोपी रोहन जाधव याच्या बहिणीस मयत ओंकार कैलास चव्हाण (वय 30, रा. आसले ता. वाई) हे त्रास देत असल्याचा राग मनात धरुन त्याचे अपहरण केले होते. त्याचा खून करुन त्याचे प्रेत भुईंज गावच्या सार्वजनिक स्मशानभुमीमध्ये जाळून पुरावा नष्ट केला होता. या घटनेतील साक्षीदारसह या टोळी गंभीर व अमानुष मारहाण करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. या टोळीतील गुन्हय़ात सहभागी असलेल्या 9 आरोपींना अटक करण्यात आलेली असून उर्वरित 9 आरोपी अटक करणे बाकी असून या टोळीवर 26 गुन्हे नोंद आहेत.
मोक्का अंतर्गत 12 आरोपी अटक
टोळी प्रमुख अक्षय लालासो उर्फ लालासाहेब पवार (रा. 209, रविवारपेठ, सातारा) टोळी प्रमुख निखील प्रकाश वाघमळे (रा अंबवडे ता. कोरेगाव, हल्ली रा. आरळे ता. सातारा), टोळी सदस्य विधीसंघर्षग्रस्त बालक, तसेच रोहन राजेंद्र जाधव (वय 19), रोहित संजय घाडगे (वय 20), समाधान उर्फ चंप्या राजेंद्र शिंदे (वय 19), सलीम खाजासाब शेख (वय 19), अमित उर्फ गोटय़ा अविनाश भोसले (वय 33), अक्षय संजीव जाधव (वय 21), वरुण उर्फ यश समरसिंह जाधव (वय 23), महेंद्र उर्फ पिंटू हणमंत जाधव (वय 46, सर्वजण रा. भुईंज, ता. वाई), व जयेश उर्फ बंटी शामराव मोरे (वय 32, रा. मालदेववाडी ता. वाई) 12 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.
मोक्का प्रस्तावासाठी यांनी घेतले परिश्रम
तीन टोळय़ांमधील 26 गुन्हेगांरावर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यासाठी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे, कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक सजन हंकारे, प्रभाकर मोरे, आशिष कांबळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, उपनिरीक्षक एम. आर. फरांदे आदींनी परिश्रम घेतले असल्याचे एसपी बंसल यांनी सांगितले व या सर्वांचे अभिनंदनही केले.