नवी दिल्ली
सरकारने देशातील पर्यटनास चालना देण्यासाठी वर्ष 2019-20 मध्ये जवळपास 37 कोटी रुपयांचा खर्च केला आहे, असे पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी मंगळवारी राज्यसभेत माहिती देताना सांगितले आहे. स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने हरतऱहेचे प्रयत्न केले आहेत.
वर्ष 2018-19 मध्ये देशातील पर्यटनास चालना देण्यासाठी जवळपास 63 कोटी रुपये आणि 2017-18 मध्ये 25 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगितले आहे. पर्यटन वाढायला हवे यासाठी अनेक उपक्रमही राबवण्यात आले होते.
पर्यटनासाठी चालना देण्याकरीता प्रिंट मिडीया, टेलीव्हिजन, ऑनलाईन, रेडिओ, थिएटर आणि मेसेज आदींच्या माध्यमातून सर्वांपर्यंत माहिती पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या माहितीसाठी पर्यटन मंत्रालयाकडून ब्यूरो ऑफ आउटरीच कम्युनिकेशन (बीओसी) दूरदर्शन आणि राष्ट्रीय फिल्म विकास निगम (एनएफडीसी) च्या माध्यमातून अभियान चालवण्यात आले आहे.
सदर अभियान सर्व राज्यात चालविण्यात आले आहे. देशातील पर्यटनास चालना देणे, यासोबत देशातील समृद्धी आणि संस्कृतीसंदर्भात लोकांना माहिती व्हावी व पर्यटनासंदर्भात जागृती निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.