मृत्यू दर दोन टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचा दर 3.5 टक्केवर पोचला आहे. हा दर 2 टक्क्यावर आणण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी जनतेचे योगदान अत्यंत मौल्यवान व महत्वपूर्ण आहे. कोणतीही लक्षणे दिसल्यासत तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. योग्य उपचारांनी कोरोना रूग्ण पूर्णपणे बरा होतो, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी जिह्यातील कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचा दर कमी करण्यासाठी शपथ घेतली आहे. तसा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. जिह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. बाधितांची मृत्यूची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. जिह्याचा कोरोना मृत्यू दर आता 3.5 टक्केवर गेला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकार्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधून कोरोना मुक्तीबाबत शपथ घेण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, जो लवकर येतो त्यालाच चांगल्या गोष्टी भेटतात. या ओळी कोविडसाठी सयुक्तिक आहे. जिह्याचा मृत्युदर 3.5 टक्केवर पोचला आहे. तो 2 टक्क्यावर आणायचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. कोरोनासारखे लक्षण असेल किंवा शंका वाटत असेल तर तत्काळ डॉक्टरशी चर्चा करा. टेस्टिंग करून घ्या. आपल्या कार्यबाहुल्यामुळे किंवा हलगर्जीपणामुळे अनेक लोक दुर्लक्ष करून घरीच उपचार करतात. मात्र असे करू नका, तत्काळ डॉक्टरकडे जा. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना बरा होतो. आपला आरोग्य विभाग त्यासाठी सज्ज आहे. पुरेसा औषधसाठा आहे. ऍन्टीजेन कीट तयार आहे. लवकरात लवकर टेस्टिंग करून घ्याल तेवढे चांगले आहे.
दुर्लक्ष केले किंवा उशिरा आल्यामुळे आपले शरीर थकलेले असते. उपचाराला योग्य प्रतिसाद देत नाही. 40 हजाराचे इंजेक्शन देऊनही रुग्ण बरे होत नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी शपथ घ्या, शासनाला मदतीचा हात देणार आहे. लक्षणे असतील तर डॉक्टरांशी सल्लामसलत करून टेस्टिंग करणार घेणार आहे. उपचार घेऊन बरा होऊन घरी परतणार आहे. हलगर्जीपणा करणार नाही. कोरोना मुक्ती अभियानामध्ये मुल्यवान सहभाग देणार आहे, अशी शपथ घेऊन आम्हाला सेवा करायची संधी द्या असे आवाहन मिश्रा यांनी केले.