प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूंचा विळखा वाढत चालला आहे. त्याचबरोबर आता पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थितीची छाया गडद झाली आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरल्याने निवारा केंद्राची स्थापना करून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पूरस्थिती निर्माण झालेल्या परिसरातील रहिवाशांना राहण्यासाठी शहरात दहा ठिकाणी निवारा केंद्रे महापालिकेच्यावतीने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱया पावसामुळे अन्नपूर्णेश्वरीनगर, चौगुलेवाडी अशा भागात पाणी साचले आहे. परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले असून घरांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे निवारा केंदे स्थापन करून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी या ठिकाणी 35 नागरिकांचे स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची सुविधा महापालिकेच्यावतीने करण्यात आली. प्रत्येकाला मास्क देऊन सामाजिक अंतर पाळण्याची सूचना करण्यात आली.
महापालिकेने शहर व उपनगरात दहा ठिकाणी निवारा केंदे स्थापन करून अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्रावर नोडल अधिकारी आणि निवारा केंद्रातील नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी अन्य चार अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी टिळकवाडी येथील कैवल्य योग मंदिरात 35 नागरिक दाखल झाले आहेत. हे केंद्र तातडीने खुले करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. खासबाग येथील जयवंती मंगल कार्यालय, साई भवन, वडगाव चावडी गल्ली येथील मल्लिकार्जुन देवस्थान सभागृह, जेल शाळा, अनगोळ, वाडा कंपाऊंड येथील आदीनाथ भवन, नेहरूनगर येथील आंबेडकर भवन, रामनगर येथील धर्मनाथ भवन, येळ्ळूर रोडवरील अन्नपूर्णेश्वरी मंगल कार्यालय, शास्त्रीनगर महात्मा फुले रोडवरील दैवज्ञ मंगल कार्यालय आदी ठिकाणी पूरग्रस्तांसाठी निवारा केंदे स्थापन करण्यात आली आहेत. या ठिकाणी नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली आहे.