सोमवारी जिल्हय़ात मुसळधार पाऊस आणखी चार दिवस खबरदारीचे आवाहन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या दोन दिवसांपासून विसावलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा जोर धरला आहे. दिवसभर सर्वत्र मुसळधार पावसाने झोडपून काढले. कोकणच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार वाऱयाच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आणखी चार दिवस कोकणातील रत्नागिरीसह संपुर्ण कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे.
आठवडाभरापूर्वी कोकण किनारपट्टीला वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. मात्र त्यानंतर या पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. रविवारपर्यंत पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. मात्र सोमवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 3.6 किलोमीटर उंचीवर आहे. तसेच कोकणच्या उत्तर भागात चक्राकार वाऱयाची स्थिती आहे. बंगालचा उपसागर ते मध्य प्रदेशाचा परिसर, जबलपूर, कोर्बा या भागात मॉन्सूनचा आस असलेला पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकणच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार वाऱयाच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 10 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती खालीलप्रमाणे आहे. गुहागर तालुक्यात मौजे गुहागर येथे गुहागर-चिपळूण रस्त्यावर मोठा दगड पडल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दगड हटवण्याचे काम सुरु आहे. राजापूर तालुक्यात मौजे वडद हसोळ येथील लक्ष्मी बाळू पळदकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. तुकाराम भिकाजी मिरजोळकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे.