विशाल कदम/ सातारा
स्वच्छतेमध्ये सातारा जिह्याचे काम चांगले आहेच त्या कामात सातत्य ठेवण्यासाठी आणि आपली मोहर कायम उमटवण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्याकडून स्वच्छता विभागावर विशेष मेहरनजर कामाच्या बाबतीत राहिलेली आहे. खासकरुन प्रत्येक बाबींवर त्यांचे बारकाईने लक्ष असल्याने जिह्यात 2022 मध्ये दिलेल्या 3213 उद्दिष्ठांपैकी 2901 जणांनी शासकीय अनुदानातून वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. त्यात कराड तालुका आघाडीवर तर पाटण तालुका पिछाडीवर आहे. सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हा 1663 ठिकाणी प्रस्तावित असून 606 प्रकल्प पुर्ण झाले आहेत. तर प्लास्टिक निर्मूलन प्रकल्प 11 ठिकाणी प्रस्तावित असून 1 प्रकल्प पूर्ण झाला आहे.
तात्कालिन राज्याचे गृहमंत्री आर. आर. आबा यांनी जेव्हा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरु केले. त्या अभियानाची सुरवात त्या काळी प्रभावीपणे केली होती. तेव्हापासून सातारा जिह्याने आपली मोहर स्वच्छतेत उमटवली आहे. गावागावात त्यावेळी हागणदारी होत्या. उकीरडे होते ते या स्वच्छतेच्या चळवळीमुळे आता दिसेनासे झालेले आहेत. घरोघरी वैयक्तिक शौचालये उभारण्यात आलेली आहेत. स्वच्छतेच्या या चळवळीत सातत्य राहिले आहे.
विनय गौडा यांच्या बदलीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर खिलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या विभागावर खास नजर ठेवलेली आहे. स्वच्छतेचे काम नेमके कोठपर्यंत आले आहे. लोकांपर्यंत याच्या योजना पोहचतात की नाही. वैयक्तिक शौचालयांचे अनुदान ग्रामस्थ घेतात की नाही. याचा ते सातत्याने आढावा स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांच्याकडून घेतात. त्यामुळेच जिह्यात स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 मध्ये वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करणे यामध्ये 3213 चे उद्दिष्ट होते. त्यापैकी 2901 पुर्ण झाली असून केवळ 505 शौचालये बांधण्याचे राहिले आहे.
घनकचरा व सांडपाणी प्रकल्पाचे 1663 प्रस्ताव होते. त्यापैकी 606 पुर्ण झाले असून 592 प्रकल्पांचे काम सुरु आहे. तसेच प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प जिह्यातील चिंचणेर, कुमठे, बुध, गोंदवले बुद्रुक, वाठार, शिरवळ, पाचवड, काळोशी, भिलार, मसूर, मल्हारपेठ येथे प्रस्तावित आहेत. त्यातील मसूर येथील प्रकल्पाचे काम पुर्ण झाल्याचे समजते.