प्रतिनिधी / कराड
कराड तालुक्यातील तांबवे येथे कोयना नदीपात्रात बॉम्ब टाकणारांच्या शोधाच्या मोहिमेने बुधवारी वेग घेतला होता. नदीपात्रात सापडलेल्या बॉम्बवरील बॅचवरून तपासाची सुत्रे हलवली जात असून सैन्य दलात सध्या सेवेत असणारे तसेच सेवानिवृत्त झालेल्या जवानांची माहिती पोलिसांनी संकलीत केली आहे. या माहितीवरून तांबवे परिसरातील गावात चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान, चौकशीवेळी काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याची चर्चा असून पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगली आहे. कराड तालुक्यातील
तांबवे येथे कोयना नदीपात्रात सापडलेला सैन्य दलातील बॉम्ब मासेमारी करणारांना सापडले होते. या प्रकाराने जिल्हा हादरला होता. सोमवारी सकाळी मासेमारी करणारे काही युवकांना पुलाखाली तीन जिवंत बॉम्ब आढळून आले होते. बॉम्बशोधक व नाशक पथकाने त्याच रात्री ते बॉम्ब फोडून निकामी केले. मात्र, हे बॉम्ब टाकले कोणी, याचा अद्यापही तपास लागलेला नाही. संबंधित बॉम्ब आयुध कारखान्यात तयार होतात. तसेच ते सैन्य दलालाच पुरविले जातात. त्यामुळे सैन्यदलात कार्यरत असलेल्या कोणीतरी तेथुन हे बॉम्ब आणले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. विभागातील गावांमध्ये त्यासाठी चौकशी केली जात आहे. अज्ञाताने टाकलेल्या त्या बॉम्बमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता. त्याच्या या कृत्यामुळे कित्तेकांना आपला जिव गमवावा लागला असता. मोठी दुर्घटना घडली असती तर जिवितहानी झाली असती. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषीला कठोर शासन करावे, अशी मागणी तांबवेचे उपसरपंच ऍड. विजयसिंह पाटील यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.