प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड ते दोन वर्षापासुन बंद असलेली सर्व धर्मिय धार्मिक स्थळे येत्या घटस्थापनेपासुन म्हणजे दि. 7 ऑक्टोंबरपासुन सर्वत्र सुरू करण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयाचे सातारा जिल्हय़ातून ही स्वागत करण्यात येत आहे. कारण अनेक सण समारंभांना भाविकांकडून धार्मिक स्थळांना आवर्जुन भेट देण्यात येते, पण मागील दीड ते दोन वर्षांपासुन यापासुन मुकावे लागले होते. पण येत्या काही दिवसातच आपल्या आराध्य देवतेचे जवळून दर्शन घेता येणार असल्याने भाविकांकडून ही आनंद वर्तविण्यात येत आहे.
सध्या धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय जरी सरकारतर्फे घेण्यात आला असला तरी, कोरोना संबंधी आखून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देखिल करण्यात आल्या आहेत. यामध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग, जंतुनाशकांचा वापर काटेकोरपणे करण्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यतः भाविकांची गर्दी एकाच ठिकाणी होणार नाही, याकडे संबंधीत भागातील आयोजकांनी विशेष लक्ष देण्याचे ही आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे आता जिल्हय़ातील सर्व धार्मिक स्थळांचे दारे भाविकांसाठी उघडण्यासाठी सज्ज झाली आहेत. मागील कित्येक महिने भाविकांकडून मंदिराबाहेरूनच दर्शन घेण्यात येत होते. पण आत्ता मात्र पुर्वीप्रमाणे मंदिराच्या आतमध्ये ही प्रवेश मिळणार आहे. मंदिरे खुली करण्याबरोबरच यात्रा उत्सवांना ही लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी, अशी अपेक्षा ही नागरिकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने वारकर व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत वारीचे निर्बंध ही वारकरी समुदायातर्फे काटेकोरपणे पाळण्यात आले. ज्या प्रमाणे मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचप्रमाणे पारायण सोहळे, किर्तन, भजन यांना ही लवकरात लवकर परवाणगी देण्यात यावे.