2017 पासून विकास निधी चुकीच्या पद्धतीने वितरित होत असल्याचा आरोप
प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाकडून जि. प. अधिनियम आणि शासन धोरणांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे पोंभुर्ले जि. प. मतदारसंघ सदस्य प्रदीप नारकर यांनी केला आहे. याबाबत जि. प. प्रशासनासह आयुक्तांचेही मागील चार वर्षांत अनेकवेळा लक्ष वेधण्यात आले. जि. प. च्या मासिक व सर्वसाधारण सभेतही विचारणा करण्यात आली. मात्र चौकशी सुरू असल्याचे सांगून चालढकल केली जात आहे. या कारभाराविरोधात आता 2 ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
2017 पासून विकास निधी चुकीच्या पद्धतीने वाटण्यात आला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. मात्र प्रशासनाने चौकशीच्या नावाखाली अद्याप कोणतीच कार्यवाही केला नसल्याचा आरोप नारकर यांनी केला आहे.
ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱया 0.50 टक्के निधीबाबतची माहिती अनेकवेळा मागणी करूनही देण्यात आलेली नाही. देवगड पंचायत समिती शिक्षण विभागातील करोडो रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या अल्लमवार यांच्यावर फौजदारी दाखल करावी. देवगड विठ्ठलादेवी-काडगेवाडी सौर विद्युत दुहेरी पंप योजना पैसे खर्च पडूनही चार वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. कारवाई केली जाईल, असे सांगूनही कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निर्लेखित झालेली नाद शाळा इमारत कोसळल्याने ती जागा ग्रामपंचायत इमारतीसाठी देण्यात यावी. देवगड तालुक्यातील काही गावातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धूप प्रतिबंधात्मक बंधाऱयाबाबत 2017-18 या कालावधीत तक्रार करण्यात आली होती. यामध्ये तथ्य असल्याचे चौकशी अधिकाऱयांच्या अहवालातून समोर आले आहे. मात्र चार वर्षे होऊनही कारवाई झालेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जि. प. प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणाबाबत सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवणार असल्याकडेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असल्याची माहिती प्रदीप नारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.