बिहारमधील दुर्घटना- चौघांना वाचविण्यात यश
पटना / वृत्तसंस्था
बिहारची राजधानी पाटणाजवळील दानापूर येथे शुक्रवारी भीषण दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक जीप गंगा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 9 जणांना जलसमाधी मिळाली. अपघातावेळी जीपमध्ये 13 प्रवासी होते. त्यापैकी चौघांचे प्राण वाचल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अपघातग्रस्त कुटुंबीय हे अकिलपूरचे रहिवासी असून विवाह सोहळय़ातून परतताना हा अपघात झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले. नदीवरील पुलावरील निसरडय़ा मार्गामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जीपमधील सर्व प्रवासी लग्नावरून परतत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रेलिंग तोडून नदीमध्ये कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफच्या बचाव पथकानेही मदतकार्यात भाग घेतला. स्थानिक पाणबुडे आणि एनडीआरएफचे जवान यांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने नदीत कोसळलेली जीप बाहेर काढण्यात आली आहे. घटनास्थळी हजारो बघ्यांची गर्दी झाली होती. पुलावरील चढावामुळे गाडय़ा घसरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गाडीच्या छतावर बसलेल्या लोकांनी उडय़ा मारल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र गाडीत बसलेल्या 9 जणांना जलसमाधी मिळाली.