वार्ताहर/ जैतापूर
राजापूर तालुक्यातून जाणाऱया सागरी महामार्गावरील धारतळे ते आंबेरी पूल या रस्त्यावर नाटे आणि जैतापूर या दरम्यान रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे जैतापूर येथील ग्रामस्थांनी श्रमदानाने भरून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन कसा कानाडोळा करते आणि लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नाही याची अनेक उदाहरणे समोर येत असतानाच जैतापूर परिसरातील सागरी महामार्गावर असेच उदाहरण पहावयास मिळाले. गेल्या चार पाच वर्षापासून राजापूर तालुक्यातून जाणाऱया सागरी महामार्गावर धारतळे ते आंबेरी पूल या रस्त्यावर नाटे आणि जैतापूर या भागातील काही ठिकाणी दर पावसाळय़ात मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेले असतात. दरवर्षी लाखो रुपये खर्चून पावसाळ्यानंतर हे खड्डे बुजविले जातात. दरवर्षी पावसाळ्यात मात्र या ठिकाणी पुन्हा खड्डे पडलेले असतात. या खड्डय़ांमुळे अनेक अपघात घडलेले आहेत. या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून गेल्यावर्षी वर्क ऑर्डर ही निघालेली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली दिसून नाही.
गेल्या चार वर्षापासून माध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली की लगेच दुसऱया दिवशी खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात होत होती. यावर्षी मात्र काही ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी स्वयंप्रेरणेने स्वखर्चाने खड्डे बुजवायला सुरुवात केली. शिवसेना सागवे उपविभाग प्रमुख राजन कोंडेकर, जैतापूरचे पोलीस पाटील राजप्रसाद राऊत, काँग्रेसचे कार्यकर्ते हर्षद मांजरेकर, सुबोध मांजरेकर यांसह श्रीकृष्ण राऊत, सुहास पवार, प्रभाकर कांबळी, जितेंद्र रांबाडे, आशिष शिवणेकर आदींसह ग्रामस्थ या कामात सहभागी झाले होते.
यासंदर्भात राजापूर बांधकाम विभागाची संपर्क साधला असता कोरोना च्या संकटामुळे मंजूर असलेल्या कामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही मात्र आपण तात्पुरत्या स्वरूपात जांभा दगड आणि मातीने हे खड्डे बुजवण्याचे नियोजन केलेले असून दोनच दिवसात कामाला प्रारंभ होणार आहे असे सांगण्यात आले.
जर महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम ग्रामस्थांना हाती घ्यावे लागत असेल तर शासन आणि प्रशासन यांना जाग आणण्याचे काम करणारे लोकप्रतिनिधी झोपा काढत आहेत का अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्यांकडून व्यक्त होत आहे. तर स्वयंस्फूर्तीने काम करणाऱया स्वयंसेवकांचे कौतुक होत असतानाच ज्यांचे शासन आहे त्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून प्रशासनाला जागे करावे लागत असेल तर शासन पक्षातील लोकप्रतिनिधींसाठी ही दुर्दैवाची बाब असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा सुरुवात करण्यात आली आहे. मात्र निधी मंजूर असताना आणि वर्क ऑर्डर झालेली असतानाही या रस्त्यावर वारंवार डागडुजीसाठी खर्च करावा लागत आहे याचा जाब लोकप्रतिनिधी विचारणार का असा सवालही व्यक्त केला जात आहे.