भारत जोडो’ नामक पदयात्रेवर असणारे काँगेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित ‘माफी’चा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरुन बराच गदारोळ उठला आहे. सावरकर हे स्वातंत्र्यवीर नसून माफीवीर आहेत, असा शोध काँगेसने लावलेला आहे. राहुल गांधी यांनी काही कागदपत्रे या संदर्भात सादर केली आणि पुन्हा एकदा जोरदार वादाला तोंड फुटले आहे. सावरकरवादी आणि सावरकरद्वेष्टे हिरीरीने त्यांचीच बाजू कशी बरोबर आहे, हे सांगत आहेत. पण, सावरकर नव्हे, तर भारताचे भाग्यविधाते म्हणून काँगेसकडून ज्यांची ओळख करुन दिली जाते, ते भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे ब्रिटीशांची माफी मागूनच कारागृहातून सुटले होते, असे प्रतिपादन भाजपने केले असून आपल्या म्हणण्याच्या पुष्टय़र्थ भाजपनेही कागदपत्रे सादर केली आहेत. नेहरुंच्या प्रत्यक्ष आत्मचरित्राचा संदर्भ भाजपकडून देण्यात आला असून नेहरुंनी ब्रिटीशांच्या कारावासातून कशी सुटका करुन घेतली, हे सप्रमाण सिद्ध केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेहरु या दोन समकालीन, पण वैचारिकदृष्टय़ा परस्परविरोधी नेत्यांच्या कारागृहातून सुटकेची तुलना होणे साहजिकच आहे. सावरकरांच्या संबंधातील माहिती अशी की, नाशिकचा त्यावेळचा न्यायदंडाधिकारी जॅक्सन यांची हत्या 1910 मध्ये झाली होती. सावरकर त्यावेळी ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी होते. तथापि, या हत्येसाठी त्यांनी पिस्तुल पुरविले म्हणून त्यांच्यावरही अभियोग लादण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावण्यात आली आणि या शिक्षा एकापाठोपाठ एक अशा भोगावयाच्या होत्या. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात 1911 मध्ये त्यांची ही शिक्षा सुरु झाली. ती इतकी मोठी होती की, त्यांच्या आयुष्याची ऐन भरातील 50 वर्षे त्यांना कारागृहात काढावी लागणार होती. शिवाय ही शिक्षा ‘कोलू फिरविण्याची’ म्हणजेच अतिशय कष्टप्रद आणि कठोर होती. नारळाच्या काथ्यापासून दोर बनविण्यासाठी तो एका विशिष्ट यंत्रात घालून फिरवून मऊ करुन घ्यावा लागतो. या यंत्राला कोलू असे म्हणत असत. तो फिरविणे अतिशय श्रमाचे आणि अवघड काम असे. जे काम बैलांनी करायचे ते या सेल्युलर कारागृहात कैद्यांकडून करुन घेतले जात आहे. ही शिक्षा भोगताना अनेक कैद्यांचा अतिश्रमामुळे आजारी पडून मृत्यूही झाल्याच्या नोंदी आहेत. अशी कठोर शिक्षा सावरकरांच्या वाटय़ाला, आणि तीही 50 वर्षांसाठी आली होती. सावरकरांनी ब्रिटीशांना शिक्षेतून सुटका देण्यासाठी काही पत्रे पाठविली आहेत. तथापि, त्यांची त्वरित सुटका झालेली नाही. 10 वर्षांच्या अशा जीवघेण्या शिक्षेनंतर त्यांची सुटका झाली होती. आता नेहरुंच्या संदर्भातील बाब अशी आहे, की ब्रिटीशांविरोधात आंदोलन केल्याने त्यांना 14 दिवसांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. शिक्षा भोगण्यासाठी त्यांना ‘नाभा’ येथील कारागृहात ठेवण्यात आले. पण ती 14 दिवसांची शिक्षाही त्यांना सहन झाली नाही. म्हणून त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांनी ब्रिटीशांकडे मनधरणी केली. नेहरुंनी ब्रिटीशांची क्षमा मागून त्या 14 दिवसांच्या शिक्षेपासून स्वतःची सुटका करुन घेतली. नेहरुंच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहे, असे भाजपने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये आढळून येते. शिवाय असेही म्हणणे अनेक तज्ञांनी मांडले आहे, की नेहरुंना स्वातंत्र्यलढय़ात अनेकदा शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण त्यांना एक अपवाद (याच 14 दिवसांच्या शिक्षेचा) वगळता कधीही कारागृहात डांबण्यात आले नव्हते. त्यांना स्थानबद्धतेत म्हणजेच कारागृहापेक्षा बऱयाच सुखावह स्थानी ठेवण्यात येत असे. शिवाय एकदाही त्यांना कधी शिक्षा भोगण्यासाठी श्रम करावे लागलेले नाहीत. एकदाच, ज्यावेळी त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते, तेव्हाही त्यांना त्यांच्या जीवाची खूप भीती वाटत होती आणि त्यामुळे ब्रिटीशांची माफी मागून त्यांनी त्वरित सुटका करुन घेतली. दोन नेत्यांच्या कारावासाच्या शिक्षेच्या अशा या भिन्न भिन्न सत्यकथा आहेत. सावरकरांच्या कथित क्षमापत्रांसंबंधी आजवर बरेच लिहिले आणि बोलले गेले आहे. नुकतेच विक्रम संपत या लेखकाने सावरकरांचे चरित्र लिहून प्रसिद्ध केले आहे. या लेखकाच्या म्हणण्यानुसार मोठी शिक्षा झालेल्या कोणत्याही कैद्याला त्याची शिक्षा कमी करण्यासाठी किंवा क्षमापित करण्यासाठी दयेचे आवेदनपत्र सादर करण्याचा अधिकार असतो. सावरकरांनी याच अधिकाराचा उपयोग केला होता. त्यामुळे त्यांच्या या आवेदनपत्रांना माफीनामा म्हणणे चुकीचे आहे. अशा प्रकारचे आवेदनपत्र आल्यानंतर त्यावर विचार होत असे आणि काही कैद्यांच्या शिक्षा कमीही झाल्या असल्याच्या नोंदी आहेत. नेहरुंच्या संदर्भात तसे नव्हते, असे दिसून येते. त्यांना मुळात शिक्षाच केवळ 14 दिवसांची होती. तीही पूर्ण भोगण्यापूर्वीच त्यांची सुटका (माफी मागूनच) झालेली होती. तेव्हा सध्याच्या स्पर्धात्मक राजकीय वातावरणात या दोन्ही नेत्यांच्या शिक्षा आणि त्यांची झालेली सुटका यांची तुलना आता तावातावाने होणार हे निश्चित आहे. ज्यांनी विनाकारण हा वाद उकरुन काढला, त्यांनी आपली बाजू कितपत भक्कम आहे, याचा विचार आधी करावयास हवा होता. कारण तुम्ही दुसऱयावर अर्धवट माहितीच्या आधारावर चिखलफेक केली, की त्याचे प्रत्युत्तर मिळणार हे निश्चित असते. ते प्रत्युत्तर तुलनात्मकदृष्टय़ा अधिक धारदार आणि झोंबणारे असले तर मग सारवासारवी करताना तारांबळ उडणेही स्वाभाविक असते. यावेळी एका जुन्या हिंदी चित्रपटातील एक ‘डायलॉग’ आठविल्याशिवाय रहात नाही. ‘जो शीशेके घरमे रहते है, वो दुसरोंपर पत्थर नही फेका करते’. याचा अर्थ असा, की जे स्वतः काचेच्या घरात रहात असतात त्यांनी दुसऱयांवर दगड फेकू नयेत. अन्यथा, तेच दगड दुसऱयांकडून स्वतःच्या घरावर पडले तर स्वतःचे काचेचे घर फुटून बेघर व्हायची वेळ येते. राहुल गांधी यांनी तशी वेळ स्वतःवर येऊ देऊ नये. राजकारण गंभीरपणे करण्याची त्यांची इच्छा असेल तर, त्यांनी सवंगपणा टाळून समंजसपणा दाखविणे आवश्यक आहे. अर्थात निवड त्यांच्या हाती आहे. परिणाम स्वीकारण्याची तयारी मात्र हवी.
Next Article Sangli : कुपवाड एमआयडीसीत बंद कारखाना फोडला
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.