प्रतिनिधी / सातारा :
भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्य रुपांतर करण्यात याव्या, यासाठी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज, विनंत्या केल्या, आंदोलने केली. तरीही कार्यवाही कासवगतीने सुरु आहे. त्याच्या निषेधार्थ आज सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. शिष्टमंडळांने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन देण्यात आले. थोरवे यांनी त्यांना बैठक लावून हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले आहे. दरम्यान, कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
शंकर माळवदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आता पर्यंत सातारा शहरातील सत्ता ब प्रकारणात कोणतीच कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत नाही. एक खिडकी योजना सुरु करुन त्याप्रकरणे वेळीच निपटारा करण्याकामी त्यांचा निश्चित उपयोग होईल. ज्याप्रमाणे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यवाही करण्यात आली आहे. तशीच कार्यवाही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेली नाही. सत्ता ब प्रकरणातील मुल्यांकन अधिमुल्य रक्कमांची चलने आपल्या कार्यालयातून उपब्ध करुन देण्यात यावीत, म्हणजे वेळेचा अपव्यय टाळता येईल. इतर कामाचा व्याप विचारात घेता कामावर वेळीच स्वाक्षरी करण्यात आपल्याला अवघड जात असल्यास याकामी जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्सम व सक्षम अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात यावेत. याकामी शासनाच्या कोषागारात कोटयावधी रुपयांचा महसूल वेळीच जमा होईल, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.