स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांची ग्वाही
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटीचा प्रकल्प हा शहर स्मार्ट होण्यासाठी आहे. या प्रकल्पाचे काम करताना झाडांची कत्तल करणे आवश्यक नाही. त्यामुळे जर स्मार्ट सिटीच्या कामाचे कारण दाखवून कंत्राटदार झाड हटवत असेल तर लोकांनी ती बाब आपल्या निदर्शनास आणून द्यावी. अशा कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी दिली.
सिटीझन्स कौन्सिलच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळी शशिधर कुरेर यांची भेट घेऊन त्यांच्याशी स्मार्ट सिटीच्या कामकाजाबद्दल व प्रामुख्याने झाडांच्या कत्तलीबद्दल चर्चा केली. त्यावेळी कुरेर यांनी हे स्पष्टीकरण दिले. कौन्सिलच्या सदस्यांसमवेत स्मार्ट सिटीच्या कामकाजाबद्दल विस्तृत चर्चा केली.
कौन्सिलने शशिधर कुरेर यांना निवेदन सादर केले असून निवेदनात म्हटले आहे की, बेळगावमध्ये अनेक प्राचीन वृक्ष आहेत. वारसा म्हणून त्यांचे जतन होणे आवश्यक आहे. एकेवेळी गरिबांचे महाबळेश्वर असे बिरुद हे शहर मिरवत होते. याचे कारण येथे असणारी नैसर्गिक संपत्ती होय. मात्र, दुर्दैवाने विकास आणि शहरीकरण या नावाखाली बेळगावची ही ओळख हरविली आहे. विकास करताना निसर्गाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे.
मात्र, सध्या शहरातील झाडांवर कंत्राटदारांची वक्रदृष्टी पडली आहे. अनेक जुन्या वृक्षांची निर्दयी कत्तल होते आहे. त्यामुळे बेळगाव भकास दिसत आहे. आम्ही सर्व जण पर्यावरणासाठी आसुसलेले असून झाडांची कत्तल पाहता आम्ही अगतिक झालो आहोत. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कोणत्याही झाडांची कत्तल केली जाऊ नये. प्राचीन वृक्षांना पुरातन वृक्ष’ असा फलक लावला गेला पाहिजे. केवळ विद्युत वाहिन्यांसाठी त्यांची कत्तल केली जाऊ नये. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तसेच उद्योग, विविध संस्था, आस्थापने यांच्या आवारांमध्ये झाडे लावण्यास प्रोत्साहन दिले जावे यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे.
बेळगाव हे हरित शहर होण्यासाठी निसर्गाशी समतोल महत्त्वाचा आहे. निसर्गातील सर्व जीवसृष्टी येथे निर्भयपणे नांदली पाहिजे. हरित शहराच्या संकल्पनेत निसर्गाच्या प्रत्येक घटकाला महत्त्व आहे. म्हणूनच शहरी वनीकरणाची संकल्पना त्वरित अंमलात आणावी, याशिवाय निसर्गाशी जवळीक साधणारी उद्याने लहान, लहान जंगले, किचन गार्डन, व्हर्टिकल गार्डन, फुल शेती या सर्वांचा विचार केला गेला पाहिजे, असे कौन्सिलचे प्रमुख सतीश तेंडोलकर यांनी व सेवंतीलाल शाह यांनी कुरेर यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी बोलताना शशिधर कुरेर यांनी सर्वप्रथम शहराच्या विकासासाठी कौन्सिलने दाखविलेल्या आस्थेबद्दल धन्यवाद दिले. झाडांची कत्तल होणार नाही, असे आश्वासन दिले. ते म्हणाले, स्मार्ट सिटीअंतर्गत काही झाडे नाईलाजाने हटवावी लागतात तेव्हा दुसरीकडे झाडे लावली जातात. एक झाड हटविल्यास आम्ही दहा झाडे अन्यत्र लावत आहोत. भाग्यनगर येथे 46 झाडे काढावी लागली. परंतु त्यातील 26 झाडांचे आम्ही केएमएफच्या आवारात पुनर्रोपण केले आहे.
बेळगाव हे वेणुग्राम म्हणजेच बांबुंचे शहर आहे. ही ओळख पुन्हा जिवंत करण्यासाठी बांबुची 500 झाडे लावली गेली आहेत. स्मार्ट सिटीच्या कामामध्ये एखाद्या झाडाचा 50 टक्क्मयांहून अधिक प्रमाणात अडथळा होत असेल तर ते झाड हटविले जाते. झाडामुळे 5 टक्के कामाचा खोळंबा झाला तर आपण ते झाड न काढता काम पुढे चालवितो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली झाडांची कत्तल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे जर झाड हटवा, असे कंत्राटदार सांगत असेल तर प्रथम ती बाब आपल्या निदर्शनास आणून द्या. त्या कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. कौन्सिलने सुचविलेल्या सूचनांचा आपण नक्की विचार करू आणि या कामामध्ये लोकांचा सहभागही घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.