चालण्याच्या शर्यतीत 8 सुवर्ण जिंकणाऱया गीता कुमारीची व्यथा : मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आर्थिक सहाय्य
रांची / वृत्तसंस्था
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये चालण्याच्या शर्यतीत 8 सुवर्णपदके जिंकणाऱया झारखंडच्या गीता कुमारीवर उदरनिर्वाहासाठी थेट रस्त्यावर उतरुन भाजी विकण्याची वेळ आली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सूचना केल्यानंतर रामगड जिल्हा प्रशासनातर्फे तिला 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले गेले आणि ऍथलेटिक्समधील कारकीर्द सुरु करण्यासाठी मासिक 3 हजार रुपयांचे मानधन मंजूर केले गेले आहे.
पैशाची चणचण भासू लागल्यानंतर गीता कुमारीला रस्त्याकडेला थांबून भाजी विकावे लागत असल्याची माहिती मुख्यमंत्री सोरेन यांना ट्वीटर हँडलवरुन मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने रामगड उपायुक्तांशी संपर्क साधत गीताला आर्थिक सहाय्य देण्याची सूचना केली.
रामगडचे उपायुक्त संदीप सिंग यांनी सोमवारी गीता कुमारीची भेट घेत तिला 50 हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. शिवाय, 3 हजार रुपयांचे मासिक मानधन अदा करत असल्याची घोषणा केली. गीताने सरावाला सुरुवात करावे, यासाठी त्यांनी तिचे मनही वळवले.
गीताने राज्यस्तरीय चालण्याच्या शर्यतीत आजवर 8 सुवर्णपदके जिंकली असून याशिवाय, कोलकात्यात संपन्न झालेल्या स्पर्धेत तिने एक रौप्य व एक कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली आहे. ‘वरिष्ठ स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला यश मिळवून देऊ शकतील, अशी बरीच गुणवत्ता रामगडमधील खेळाडूंमध्ये आहे आणि अशा खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची तयारी आहे’, असे रामगडचे उपायुक्त संदीप सिंग यांनी पत्रकातून नमूद केले.
गीता कुमारीचा चुलत भाऊ धनंजय प्रजापतीने सांगितले, ‘गीता रस्त्यावर थांबून भाजी विकते. शिवाय, ती हजारीबागमधील आनंदा महाविद्यालयात कला शाखेच्या तिसऱया वर्षात शिकते. तिचे कुटुंबीय आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आहेत. तिने ऍथलेटिक्समधील कारकीर्द निम्म्यातच सोडून देऊ नये, अशी आम्हा सर्वांचीच इच्छा होती. प्रशासनाने पुढाकार घेतल्यामुळे ती अतिशय आनंदी आहे’ यापूर्वी, मागील महिन्यात झारखंड प्रशासनाने धनबाद जिल्हय़ातील राष्ट्रीय तिरंदाज सोनू खतूनसाठी देखील मदतीचा हात पुढे केला. सोनूला देखील तिच्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी भाजी विक्रीचा पर्याय स्वीकारावा लागला होता.