विशेष प्रतिनिधी/ देवरूख
देवरूख एसटी आगाराच्या भोंगळ कारभाराविरोधात संगमेश्वर तालुका भाजपाने आगारालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिलेला असताना आता अधिकारी स्वतःहूनच आगाराला टाळे लावणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. टायर नसल्याने आगारातील 10 पेक्षा अधिक बसेस जागेवरच उभ्या असून लांब पल्ल्याच्या महत्वाच्या फ्sढऱया बंद करण्याची नामुष्की आगारावर आली आहे. यामुळे देवरूख आगाराचे नक्की चाललेय तरी काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
आगारातील काही बसेस मुंबईत बेस्टच्या ताफ्यात पाठवण्यात आल्याने आधीच बसची संख्या मर्यादित आहे. त्यातच टायर नसल्याने आणखी काही गाडय़ा बंद ठेवण्याची वेळ आगारावर आली आहे. यामुळे आगार व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुपारी 1 वाजता सुटणारी देवरूख-सावंतवाडी बस गेले चार दिवस बंद असल्याबाबत माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने देवरूख आगाराला भेट दिली असता हे सत्य बाहेर पडले. केवळ देवरूख-सावंतवाडीच नव्हे तर देवरूख-म्हसवड, देवरूख-लातूर अशा महत्वांच्या गाडयांसहीत अन्य लांब पल्ल्याच्या गाडय़ा 1 फ्sढब्रुवारीपासून बंद आहेत.
आगारात उभ्या असलेल्या गाडय़ाचे टायर कधी फ्gढटतील, ते सांगता येत नाही अशी स्थितीत आहेत. चार दिवसापूर्वी पांगरी येथे छोटय़ा पुलावर दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता दोन गाडय़ा बंद पडल्याने या मार्गावरची वाहतूक काही तास बंद होती. गाडय़ाची देखभाल दुरूस्ती वेळेत होत नसल्याने गाडय़ा मध्येच बंद पडत असतानाही आगारप्रमुखांच्या व्यवस्थापनावरच प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याच पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुका भाजपाने 8 दिवसात कारभार न सुधारल्यास देवरूख आगाराला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र आगाराची वाटचाल पाहता भाजपाला काहीही करण्याची गरजच राहणार नाही. वरिष्ठांचे दुर्लक्षच कुलूप लावण्यास कारणीभूत ठरेल, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. येथील आगारप्रमुखांची मागील महिन्यात प्रशासकीय बदली झाली आहे. मात्र प्रशासकीय बदलीची कुणकुण लागताच आगारप्रमुख वैद्यकीय रजेवर गेल्याची चर्चा आहे. यापूर्वीही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे या आगारप्रमुखांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.