प्रतिनिधी / सातारा :
कचराकुंडीमधील कुजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी, पाण्याच्या नळाखाली खोदण्यात येणारे खडडे, हंडा मोर्चे, आणि महत्वाच्या रस्त्यांसह पेठापेठांतील रस्त्यांवरील रात्रीच्या अंधाराच्या साम्राज्यामुळे नगरपरिषदेचे दुर्भाग्यपूर्ण अस्तित्व पूर्वी जाणवत असे. खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेने गेल्या काही वर्षात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली. कचरा संकलनाला प्रथमप्राधान्य देऊन, पश्चित महाराष्ट्रात सर्वप्रथम घंटागाडयाच्या माध्यमातून कचराकुंडीमुक्त सातारा ही संकल्पना राबविली. म्हणूनच घंटागाडयांमुळे नगरपरिषदेचे अस्तित्व मान्य करताना, स्वच्छता विकासाची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी आपणहून दिली आहे. त्यांनी केलेल्या टिकात्मक सूचनांचा सकारात्मकतेने आदर करुन अधिक गतीने सातारकरांसाठी सातारा विकास आघाडी नेहमीच कार्यरत राहील, अशी प्रतिक्रीया सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी व्यक्त केली.
याबाबत मनोज शेंडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, आता हंडे मोर्चे काढण्याची वेळच येत नाही. दिवाबत्तीच्या चांगल्या सोयी गल्लीबोळासह करण्यात आलेल्या आहेत. कचरा साठुच नये अशी कार्यवाही केली जाते. तसेच कोविड-19 या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने नगरपरिषद सुरुवातीपासूनच सतर्कतेने कार्यरत आहे. अनेक विलगीकरण केंद्रांना अलिकडच्या काळात नगरपरिषदेच्या माध्यमातुन मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सुरुवातीपासून सुरु केलेल्या खावली येथील विलगीकरण केंदामध्ये सर्व मुलभुत स्वच्छतेच्या सेवा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडूनच आज अखेरपर्यंत दिल्या जात आहेत. म्हणूनच नगरपरिषदेने वेगळे स्वतःचे विलगीकरण केंद्र सुरु केले नाही. तसेच कात्रेवाडा शाळा येथील विलगीकरण केंद्राला नगरपरिषदेनेच सर्व मुलभुत सुविधा पुरविल्या आहेत. तसेच आवश्यक तो औषध पुरवठाही करीत आहे. प्रत्येक प्रभागात कोविड पेशंट आढळुन आल्यावर परिसराचे सॅनिटायझेशन, बॅराकेटींग, सुक्ष्मप्रतिबंधीत क्षेत्र जाहिर करण्यात आल्यावर करण्याच्या उपाययोजना नगरपरिषद करीत आहे. तसेच दैनंदिन स्वच्छता नियमितपणे राहण्यासाठी विशेष कटाक्षाने दक्षता नगरपरिषदेच्या कर्मचा-यांमार्फत घेण्यात येत आहे.
कोविड मृतांचे अंत्यसंस्कार देखिल नगरपरिषद स्वखर्चाने करीत आहे. तसेच लसीकरणासाठी लस उपलब्ध करुन घेवून कस्तुरबा प्रा.आरोग्य केंद्र, गोडोली प्रा.आरोग्य केंद्र, शाहुपूरी ग्रामपंचायत इमारतीमधील लसीकरण केंद्र, शानभाग विद्यालय, श्रीपतराव पाटील हायस्कूल-करंजे, पिरवाडी, विलासपूर, विक्रांतनगर,चंदननगर,विशाल सहयाद्री शाळा-शाहुनगर, जि.प.शाळा खिंडवाडी, येथे, लसीकरण केंद्र सुरु केली आहेत. लसीकरण करणे हाच कोरोनावर प्रतिबंधात्मक प्रभावी उपाय आहे म्हणून लसीकरण मोहिम विशेष गतीने राबविणेत येत आहे.
यापार्श्वभुमीवर नगरपरिषदेने विलगीकरण कक्ष सुरु केला नाही म्हणून नगरपरिषदेचे अस्तित्व दिसत नाही अशी टिका योग्य ठरणारी नाही. तरी सुध्दा केलेल्या टिकेचा सकारात्मकतेने विचार करुन, नगरपरिषदेमार्फत आणखी काही उपाययोजना गतीने राबविण्याकरीता सातारा विकास आघाडी कटीबध्द आहे .