ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील काही दिवसांपासून अनेक राजकारणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेताना दिसत आहेत. पण आज टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने सगळ्यांचा धक्का बसला आहे. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, भारतीय संघाने रविवारी इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना जिंकला आणि मालिका 2-1 अशी खिशात टाकली. त्यानंतर आता भारतीय संघातील खेळाडू मुंबईत दाखल झाले असून ते आयपीएलच्या तयारीला लागलेले आहेत. त्यातच रवी शास्त्री यांनी मात्र आज महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली आहे.
- शास्त्रींच्या प्रशिक्षणात टीम इंडियाची भरारी
58 वर्षीय रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला नव्या उंचीवर नेले आहे. 2017 मध्ये शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग दोनदा कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. रवी शास्त्री हे 2014 ते 2016 या काळात टीम इंडियाचे संचालकही राहिले आहेत.
- रवी शास्त्री यांची कारकीर्द
रवी शास्त्री यांनी भारतासाठी 80 कसोटी सामन्यांत 3,830 धावा केल्या आहेत, तर 151 बळी घेतले आहेत. कसोटी सामन्यात त्यांनी 11 शतके आणि 12 अर्धशतके ठोकली आहेत. रवी शास्त्रींनी 150 एकदिवसीय सामन्यात 3,108 धावा केल्या, तर 129 बळी घेतले. त्यांनी एकदिवसीय सामन्यात 4 शतके, तसेच 18 अर्धशतकेही आहेत.