दुसऱया टी-20 लढतीत विंडीजला 8 धावांनी नमवले, सामनावीर रिषभ पंत व विराटची आक्रमक अर्धशतके
कोलकाता / वृत्तसंस्था
विराट कोहली-रिषभ पंत यांची आक्रमक अर्धशतके व भुवनेश्वर-हर्षलच्या स्लॉग ओव्हर्समधील नियंत्रित, चतुरस्त्र गोलंदाजीच्या बळावर भारताने विंडीजविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यात 8 धावांनी निसटता विजय संपादन केला आणि 3 सामन्यांची ही मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने खिशात घातली. भारतासाठी हा टी-20 क्रिकेट प्रकारातील 100 वा विजय असून सलग आठवा मालिकाविजय देखील आहे.
भारताने या लढतीत निर्धारित 20 षटकात 5 बाद 186 धावा फटकावल्या तर प्रत्युत्तरात विंडीजला 3 बाद 178 धावांवर समाधान मानावे लागले. विजयासाठी 187 धावांचे आव्हान असताना रोव्हमन पॉवेल (36 चेंडूत नाबाद 68) व निकोलस पूरन (41 चेंडूत 62) यांनी जबरदस्त फलंदाजी साकारत विजय खेचून आणलाच होता. पण, निर्णायक क्षणी डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमारच्या नियंत्रित गोलंदाजीमुळे भारताला सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब करता आले. स्लोअर ऑफ कटरवर भुवनेश्वरने पूरनचा घेतलेला बळी महत्त्वाचा होता. शेवटच्या 2 षटकात 29 धावांची गरज असताना भुवनेश्वरने 19 व्या षटकात केवळ 4 धावा दिल्या, हा या लढतीचा टर्निंग पॉईंट ठरला.
विंडीज ः ब्रेन्डॉन किंग झे. यादव, गो. बिश्नोई 22 (30 चेंडूत 2 चौकार), काईल मेयर्स झे. व गो. चहल 9 (10 चेंडूत 1 चौकार), निकोलस पूरन झे. बिश्नोई, गो. कुमार 62 (41 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), रोव्हमन पॉवेल नाबाद 68 (36 चेंडूत 4 चौकार, 5 षटकार), केरॉन पोलार्ड नाबाद 3 (3 चेंडू). अवांतर 14. एकूण 20 षटकात 3 बाद 178.
गडी बाद होण्याचा क्रम
1-34 (मेयर्स, 5.1), 2-59 (किंग, 8.3), 3-159 (पूरन, 18.3).
गोलंदाजी
भुवनेश्वर 4-0-29-1, दीपक चहर 4-0-40-0, यजुवेंद्र चहल 4-0-31-1, हर्षल पटेल 4-0-46-0, रवी बिश्नोई 4-0-30-1.
भुवीच्या त्या षटकात अवघ्या 4 धावा आणि हाच ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट!
डावातील 19 व्या षटकात भुवनेश्वर कुमार गोलंदाजीला आला, त्यावेळी विंडीजला शेवटच्या 2 षटकात 29 धावांची आवश्यकता होती आणि पूरन-पॉवेलसारखे अव्वल दर्जाचे सेट झालेले फलंदाज क्रीझवर होते. भुवीचा अलीकडील फॉर्म चिंतेचा होता. पण, अनुभव पणाला लावून मारा करणाऱया या स्विंग सम्राट गोलंदाजाने षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि पूरनचा बळीही घेतला. इथेच सामन्याची सारी समीकरणे पालटून गेली.
शेवटच्या षटकातील नाटय़….
हर्षलच्या डावातील शेवटच्या षटकात विजयासाठी 25 धावांची आवश्यकता असताना पहिल्या दोन चेंडूंवर 2 एकेरी धावा निघाल्या आणि 4 चेंडूत 23 धावांची गरज असताना पॉवेलने सलग 2 षटकार खेचत खळबळ उडवून दिली. यानंतर उर्वरित 2 चेंडूत 11 धावा, असे समीकरण होते. पण, पाचव्या चेंडूवर पॉवेलला एकच धाव घेता आली आणि भारताचा विजय येथेच सुनिश्चित झाला.