आयोजन समितीची घोषणा, 27 जूनऐवजी नव्या रुपरेषेनुसार स्पर्धेची फेररचना
वृत्तसंस्था/ पॅरिस
यंदाची टूर दि फ्रान्स स्पर्धा दि. 29 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत होईल, अशी घोषणा आयोजन समितीने केली. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, ही स्पर्धा दि. 27 जूनपासून होणे अपेक्षित होते. मात्र, कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे या स्पर्धेवर देखील विपरित परिणाम दिसून आला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी जुलैच्या मध्यापर्यंत सार्वजनिक उपक्रमावर पूर्णपणे बंदी लादली. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
ही स्पर्धा लांबणीवर टाकली गेल्याने व्यावसायिक सायकलिंग संघ आणि चाहत्यांना दिलासा मिळाला. याचबरोबर तीन आठवडे चालणाऱया या स्पर्धेचा कालावधी देखील बदलला. एरवी ही स्पर्धा फ्रान्समधील उन्हाळी सुटीच्या कालावधीत होते आणि ती पाहण्यासाठी होणारी जवळपास 10 दशलक्ष चाहत्यांची दुतर्फा गर्दी, हे या स्पर्धेचे खरेखुरे वैभव आहे.
‘राष्ट्राध्यक्षांनी सोमवारी सायंकाळी केलेल्या घोषणेनुसार, जुलैच्या मध्यापर्यंत गर्दीचे कोणतेही उपक्रम होऊ शकणार नाहीत. त्यामुळे, आम्ही यंदाच्या टूर दि फ्रान्स स्पर्धेची पुनर्रचना करत आहोत. नव्या रुपरेषेनुसार, ही स्पर्धा दि. 29 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत होईल’, असे आयोजन समितीने पत्रकाद्वारे नमूद केले.
दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील ही स्पर्धा पूर्वनियोजित मार्गावरच होईल. त्याची सुरुवात नाईस येथून होईल व सांगता पॅरिसमध्ये होईल, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. पुनर्रचना केल्यामुळे सायकलिंग संघांना आर्थिकदृष्टय़ा संजीवनी लाभेल. शिवाय, सध्या गर्दी टाळली जाणार असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा हेतू साध्य केला जाईल. टूर दि फ्रान्सच्या निमित्ताने जवळपास साडेचार हजार लोकांचा कारवा देशात असतो. ऑगस्टमध्ये स्पर्धा होत असल्यास हॉटेल्सही सहज उपलब्ध होऊ शकतील, असा आयोजन समितीचा यामागे होरा आहे.
21 दिवसांच्या या स्पर्धेतील 8 दिवसांचा टप्पा पठारातील रस्त्यांवर असतो आणि तेथे यंदा या स्पर्धेचे सौंदर्य अधिक उजळेल, असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला. टूर दि फ्रान्स स्पर्धेच्या निमित्ताने 3 हजार किलोमीटर्स अंतरापर्यंत स्मित हास्य झळकेल, असे स्पर्धा संचालक ख्रिस्तियन प्रुडहोम यांनी नमूद केले. फ्रान्समध्ये दि. 17 मार्चपासून लॉकडाऊन सुरु असून कोव्हिडमुळे तेथे आतापर्यंत 15700 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
ऑगस्टमधील शेवटच्या आठवडय़ापर्यंत जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आलेले असेल. त्यामुळे, आयोजन समितीने हा कालावधी निवडला आहे.