वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱया भारताच्या पाच खेळाडूंना यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनातून हे खेळाडू आता पूर्णपणे बरे झाले असल्याने त्यांना लवकरच कोरोना लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याची माहिती भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.
नजिकच्या काळात कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात येणाऱया भारतीय ऍथलीटस्मध्ये चार नेमबाज आणि एक मुष्टीयोद्धा यांचा समावेश आहे. 60 किलो वजनगटात 2018 च्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत कास्यपदक मिळविणारी सिमरनजीत कौर, आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरूषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत रौप्यपदक मिळविणारा 19 वर्षीय सौरभ चौधरी, त्याचप्रमाणे 2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, दीपककुमार आणि मिराज अहमद खान यांनाही कोरोना लसीचा पहिला डोस लवकरच देण्यात येणार आहे. सरनोबतने जकार्ता आशियाई स्पर्धेत 25 मी. पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक तसेच पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत दीपककुमारने रौप्यपदक मिळविले होते. भारतीय मुष्टीयुद्ध आणि नेमबाजी संघटनेने केलेल्या विनंतीनुसार या पाच ऍथलीटस्चे लवकरच लसीकरण केले जाणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला 23 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी जाणाऱया भारतीय चमूतील 120 ऍथलीटस् आणि 27 पॅराऍथलीटस्ना कोरोना लसीचा पहिला डोस यापूर्वी देण्यात आला आहे.