प्रतिनिधी/मिरज
मिरज-कोल्हापूर रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱया वाळू माफीयांवर कारवाई करण्यास गेलेल्या महसूल विभागातील अधिकाऱयाचा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, काही अंतरावरच ट्रकचे टायर फुटल्याने तलाठय़ाच्या अपहरणाचा डाव फसला. ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असून, पोलिसांनी वाळू वाहतूक करणारे चार ट्रक ताब्यात घेतले आहेत. याबाबत तलाठी प्रकाश विठ्ठल पांढरे यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात अज्ञात वाळूमाफीयांविरुध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी मध्यरात्री मिरज-कोल्हापूर रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करणारे चार ट्रक थांबले असल्याची माहिती तलाठी प्रविण जाधव यांना मिळाली. त्यांनी तहसीलदार रणजीत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील अन्य कर्मचाऱयांसमवेत कोल्हापूर रस्त्याकडे धाव घेतली. तेथे वाळूने भरलेले चार ट्रक थांबले होते. यापैकी दोन ट्रकची तोंडे मिरजेच्या बाजूने होती. तर नंबरप्लेट नसलेल्या अन्य दोन ट्रकची तोंडे कोल्हापूरच्या दिशेने होती. कारवाई करण्यास गेलेल्या तलाठी जाधव यांच्यासोबत महसूल विभागातील अन्य कर्मचारी व पोलिस कर्मचारीही होते.
यावेळी तलाठी जाधव यांच्यासह महसूलच्या कर्मचाऱयांनी ट्रकमध्ये चढून ट्रकचालकांकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी जाधव हे कोल्हापूरच्या दिशेने तोंड करुन उभे असलेल्या ट्रकमध्ये चढले होते. त्यावेळी ट्रक चालकाने जाधव यांना ट्रक वळवून घेतो, असे म्हणून ट्रक सुरू करताच भरधाव वेगाने कोल्हापूरच्या दिशेने पळविण्यास सुरू केली. यावेळी जाधव यांनी आरडाओरडा करताच अन्य कर्मचाऱयांनी या ट्रकचा पाठलाग सुरू केला. यावेळी तहसीलदार रणजीत देसाईही घटनास्थळी दाखल झाले होते.
कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱया ट्रकचा पाठलाग करीत असतानाच सदर वाळूमाफीयांचे अन्य साथीदार इनोव्हा आणि अल्टो कारमधून तहसीलदार आणि पोलिसांच्या वाहनाचा रस्ता अडविण्याचा प्रयत्न करीत होते. चारचाकी आडवी मारुन मोठा अपघात घडविण्याचा प्रयत्न सुरू होता. तहसीलदारांनी सतर्कता दाखवित या ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला होता. मध्यरात्री कोल्हापूर रस्त्यावर महसूल अधिकारी आणि वाळूमाफीयांच्या फिल्मीस्टाईल थरार सुरू होता.
कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने पळविला जात असलेला ट्रक शिरोळ हद्दीत आला असता ट्रकच्या मागीलबाजूचे चाक फुटले. त्यामुळे ट्रक चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. तलाठी जाधव यांनी सतर्कता दाखवित चालत्या ट्रकमधून उडी मारली. त्यामुळे ट्रक काही अंतरावर जावून जागीच थांबला. मात्र, या प्रकारानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यानंतर शिरोळचे तहसीलदार व महसूल विभागातील अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ताब्यात घेतला. घडल्या प्रकारामुळे पोलिस, महसूल अधिकारी तहसीलदार आणि वाळू माफियांच्यात पाठलाग करण्यावरुन थरार झाला. याबाबत तलाठी प्रकाश विठ्ठल पांढरे यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चार अज्ञात वाळू माफियांविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि सरकारी अधिकाऱयांच्या अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.