सावंतवाडी/ प्रतिनिधी-
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारने सर्व तत्वे पायदळी तुडवून भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले . सरकारच्या या निर्णयाचा भाजपाकडून निषेध करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. अडगळीत पडलेल्या भास्कर जाधवांनी प्रसिध्दीसाठी आमदारांचे निलंबन करण्याचा ड्रामा केला. त्यांनी लोकशाहीची हत्या केली असा आरोपही तेली यांनी केला.
भाजप ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी सुरुवातीपासून त्याच्या बाजूने होते. परंतु, राज्य सरकारने गेले १५ महिने काहीही केले नाही. अध्यक्षपद, पुरवणी मागण्याबाबत काहीतरी दगा फटका होईल याच भीतीने राज्य सरकारने या १२ आमदारांचे निलंबन केले असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. या निलंबन विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती देखील यावेळी राजन तेली यांनी दिली आहे.
सरकार सर्वच बाजूने अपयशी ठरले आहे. तिन्ही पक्षात ताळमेळ नसल्यानेच राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे बळी गेले आहेत. त्यामुळेच यावेळी अधिवेशन देखील २ दिवसांचे भरवण्यात आले आहे. सरकार सर्व बाबतीत उघडे पडेल, त्यामुळे घाबरत असून, ५ पेक्षा जास्त दिवस एकही अधिवेशन या राज्य सरकारच्या काळात झाले नाही. पुढच्या काळात राज्य सरकार विरोधात भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक मनोज नाईक, महेश धुरी, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.